जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत
कोल्हापूर (प्रतिनिधी) - राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूका नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर१४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्व संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग सक्रीय झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचना जाहीर केल्या आहेत. त्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून अंतिम प्रभाग रचना निश्चित झाली आहे. पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणूकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीनंतर नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुक होणार आहे. सर्वात शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.




