"वन्यजीवांच्या रक्षणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा" - मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद
कोल्हापूर (प्रतिनिधी) - वनविभाग कोल्हापूर आणि वन्यजीव विभाग कोल्हापूर यांच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) मधून झाला. आमदार अमल महाडिक व मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद (आयएफएस) हे प्रमुख उद्घाटक होते. अध्यक्षस्थानी 'प्रिन्स शिवाजी'चे अध्यक्ष बी. जी. बोराडे होते. मानव व वन्यजीव यांचे सहजीवन परस्परपूरक आहे. वन्यजीवांच्या रक्षणासाठी वन्यजीव विभाग कार्यरत आहेच, पण त्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन गुरूप्रसाद यांनी केले.

सह्याद्रीतील तीन वाघांचे नामकरण सेनापती, सुभेदार व बाजी असे केल्याने लोकांचा वाघ व इतर वन्यजीवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल, अशी अपेक्षा सह्याद्री व्याघ्र राखीवचे संचालक तुषार चव्हाण यांनी व्यक्त केली. कोल्हापूर परिक्षेत्रात वन्यजीवांच्या उपचारांसाठी एक सुसज्ज हाॅस्पिटल उभारण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली. पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना एनआयटीकडून कायम प्राधान्य राहील आणि यात आमचे विद्यार्थी अग्रभागी राहतील, असे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले. यावेळी वाघाची प्रतिकृती असलेल्या चित्ररथाला मान्यवरांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या रथासोबत न्यू माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सायकल रॅली व एनआयटीच्या विद्यार्थ्यांची पायी रॅली निघाली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी वन्यजीव रक्षणाच्या घोषणा दिल्या. रमण कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अमोल कुलकर्णी, राजु सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर आभारप्रदर्शन धैर्यशील पाटील यांनी केले. या सप्ताहात संपूर्ण जिल्हाभर वन्यजीव रक्षण जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील (आयएफएस), उपवनसंरक्षक तुषार चव्हाण (आयएफएस), विभागीय वनअधिकारी धैर्यशील पाटील, सह्याद्री व्याघ्र राखीवचे संचालक तुषार चव्हाण, विभागीय वनअधिकारी संजय वाघमोडे, श्रीकांत पवार, कमलेश पाटील, विलास काळे, प्रियांका भवर, मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी, प्रिन्स शिवाजीचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील, प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, मुख्याध्यापक उदयकुमार संकपाळ, स्टाफ, विद्यार्थी व कोल्हापूरचे सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.




