विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर तामिळनाडूत नवा ट्विस्ट; सी.व्ही. षण्मुगमांचा मोठा निर्णय,अण्णाद्रमुकमध्ये खळबळ

विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर तामिळनाडूत नवा ट्विस्ट; सी.व्ही. षण्मुगमांचा मोठा निर्णय,अण्णाद्रमुकमध्ये खळबळ

तामिळनाडू (वृत्तसंस्था) : अभिनेता जोसेफ विजय यांनी 10 मे रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तब्बल 5 दिवसांनंतर सत्तास्थापनेचा तिढा सुटला होता. विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्या. मात्र, सत्तास्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांच्या नाकीनऊ आले होते. सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले. व्हीसीकेच्या दोन आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या दोघांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने टीव्हीकेचं संख्याबळ 120 वर पोहोचलं आणि सत्तास्थापनेचा तिढा सुटला. मात्र आता सरकार स्थापन करुन विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 

तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एक मोठी उलथापालथ झाली आहे. AIADMK (अण्णा द्रमुक) पक्षातील अंतर्गत कलह आता उघडपणे समोर आला आहे. अण्णाद्रमुकच्या षण्मुगम गटाचा टीव्हीके सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता काठावर बहुमत असलेल्या विजय सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. AIADMK नेते सी.व्ही. षण्मुगम यांनी म्हटले, आम्ही जनतेचा कौल (जनादेश) स्वीकारतो. जनतेचा हा कौल केवळ 'TVK' या पक्षासाठी नाही, तर तो विजय यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी होता. आम्ही मुख्यमंत्री विजय यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखालील 'TVK' सरकारला आमचा पाठिंबा जाहीर करतो, असं सी.व्ही.षण्मुगम म्हणाले. 

सी.व्ही.षण्मुगम म्हणाले की, आम्ही या पक्षाची स्थापनाच 'DMK' (द्रमुक) पक्षाच्या विरोधात केली होती. गेल्या 53 वर्षांपासून आमचे राजकारण हे प्रामुख्याने 'DMK' ला विरोध करण्याभोवतीच फिरत आले आहे. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, 'DMK' च्या पाठिंब्याने AIADMK चे सरकार स्थापन करण्याचा एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, आमच्या पक्षाच्या बहुतांश सदस्यांनी ही कल्पना फेटाळून लावली आणि तिला तीव्र विरोध केला. जर आम्ही 'DMK' सोबत युती केली असती, तर AIADMK चे अस्तित्वच धोक्यात आले असते. आमच्या सदस्यांना अशी परिस्थिती कदापि मान्य नव्हती. सध्या आम्ही कोणत्याही युतीशिवाय स्वतंत्रपणे उभे आहोत. त्यामुळे आता आमचे संपूर्ण लक्ष हे आमच्या स्वतःच्या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यावर आणि तो अधिक बळकट करण्यावर केंद्रित करणे गरजेचे आहे. म्हणूनच, आम्ही विजयी ठरलेल्या 'TVK' या पक्षाला आमचा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सी.व्ही.षण्मुगम यांनी स्पष्ट केलं.