'त्या' लोकांसमोर अक्षय कुमारला कमीपणा वाटतो
मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार हा त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखला जातो. मात्र नुकत्याच एका शोमध्ये त्याने आपल्या मनातील एक मोठी खंत बोलून दाखवली आहे. 'व्हील ऑफ फॉर्च्यून' या शोचे सूत्रसंचालन करताना अक्षयने कबूल केले की, जेव्हा तो उच्चशिक्षित लोकांना भेटतो, तेव्हा त्याला स्वतःबद्दल न्यूनगंड वाटतो.

अक्षय कुमार हा कॉलेज ड्रॉपआउट आहेत, पण आपल्या मेहनतीनं त्यानं बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण केली. 'व्हील ऑफ फॉर्च्यून' शोमधील सोनाली नावाच्या एका उच्चशिक्षित स्पर्धकाशी संवाद साधताना अक्षय भावुक झाला. तो म्हणाला, "तुमच्यासारख्या अनेक शैक्षणिक पदव्या घेतलेल्या व्यक्तीसमोर, माझ्यासारख्या फारशा न शिकलेल्या माणसाला कधीकधी खूप कमीपणा वाटतो. मला वाटतं की मी अधिक वाचायला हवं होतं, पण आता इच्छा असूनही मी वाचू शकत नाही, कारण मला वाचनाची आवडच नाही. जेव्हा कधी मी पुस्तक वाचायला बसतो, तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं".
अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना ही एक प्रसिद्ध लेखिका आहे. तिने आतापर्यंत चार पुस्तके लिहिली असून पाचव्या पुस्तकावर ती काम करत आहे. यावर मिश्किलपणे भाष्य करताना अक्षय म्हणाला, "माझी पत्नी लेखिका आहे, पण मी तिचे एकही पुस्तक वाचलेले नाही. तिने नुकतीच तिची पदव्युत्तर पदवी पूर्ण केली असून आता ती पीएचडी करण्याचा विचार करत आहे".
आपल्या चाहत्यांना आणि मुलांना अक्षयने मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला, "माझ्यासारख्या लोकांचे अनुकरण करू नका, तर सोनालीसारख्या सुशिक्षित लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आयुष्यात शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मी माझ्या मुलांनाही जास्तीत जास्त शिकण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करतो". दरम्यान, अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'भूत बंगला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहेत. याशिवाय तो 'हैवान' आणि बहुप्रतिक्षित 'हेरा फेरी ३' मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.




