नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी श्री अंबाबाईची अंबारीतील शाही पूजा
कोल्हापूर (प्रतिनिधी) - शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ललिता पंचमीच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची अंबारीतील शाही पूजा बांधण्यात आली आहे. या पूजेमध्ये देवी अंबाबाई अंबारीत विराजमान होऊन आपली जिवलग सखी श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीला निघाल्याचे प्रतीक मानले जाते.

असं सांगण्यात येतं की, कोल्हासूर राक्षसाचा वध करताना अंबाबाईने त्याला वरदान दिले की या नगरीस त्याचेच नाव दिले जाईल. म्हणूनच या शहराचे नाव 'कोल्हापूर' पडले. पुढे कोल्हासुराचा नातू कामाक्ष याने कपिल मुनींकडून योगदंड प्राप्त करून अंबाबाईसह सर्व देवतांना बकऱ्यांमध्ये रूपांतरित केले. या संकटातून केवळ त्र्यंबोली देवीच बचावली. या संकटाची जाणीव होताच, त्र्यंबोली देवीने चातुर्याने कामाक्ष दैत्याकडून योगदंड हस्तगत केला आणि त्याच्यावर पलटवार करून त्यालाच बकऱ्यामध्ये रूपांतरित केले. यामुळे अंबाबाईसह सर्व देवतांची मुक्तता झाली.
यानंतर अंबाबाईच्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला आमंत्रित करणे विसरले गेले. त्यामुळे ती रागाने शहराबाहेरच्या टेकडीवर जाऊन अंबाबाईकडे पाठ फिरवून बसली. ही चूक लक्षात येताच अंबाबाई स्वतः देवतांसह त्र्यंबोली देवीच्या भेटीला गेली आणि तिला वरदान दिले की, "तू या क्षेत्राची संरक्षक देवता आहेस. जो कुणी तुझे स्मरण न करता पुण्यकर्म करेल, त्याचे पुण्यफळ तुला प्राप्त होईल. तसेच कुष्मांडभेदनाचा सोहळा यापुढे तुझ्या समोरच होईल आणि मी दरवर्षी तुझ्या भेटीला येईन."
याच पार्श्वभूमीवर, दरवर्षी ललिता पंचमीला अंबाबाई देवी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी अंबारीतून बाहेर पडते, असा भाव या पूजेमध्ये आहे. आजच्या दिवशी अंबाबाईची अंबारीतील शाही पूजा मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते.




