नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी राजे फौंडेशन सदैव तत्पर - नवोदितादेवी घाटगे

नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी राजे फौंडेशन सदैव तत्पर - नवोदितादेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील नागरिक विशेषतः महिला व वृद्ध वेळेत आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात. नागरिकांच्या वेळेत आरोग्य तपासणी व उपचारासाठी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे यांनी केले.

सुळकूड (ता. कागल) येथे शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७व्या जयंती निमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिरच्या उद्घाटनवेळी त्या बोलत होत्या. राजे विक्रमसिंह घाटगे बँक,राजे फाउंडेशन,यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले. 

घाटगे पुढे म्हणाल्या, कागलमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राजे फाउंडेशनच्या माध्यमातून विभागावर मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. यामध्ये निदान झालेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांत आरोग्याच्या बाबतीत अनास्था दिसून येते. त्याच्यामध्ये आजार अंगावर काढण्याची मोठी प्रवृत्ती आढळते. त्यांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी.  

कागल येथील रेणुका माता मंदिरमधील सभागृहात हे मोफत आरोग्य शिबिर झाले.यामध्ये४७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. 

या शिबिरात वैद्यकीय सल्ला, इसीजी, शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी मोफत केली. टू डी इको व टीएमटी टेस्ट या टेस्ट पन्नास टक्के सवलतीच्या दरात केल्या. शिबिरामध्ये सिद्धिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर,नंदादीप नेत्रालय कोल्हापूर , प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा सांगाव,कोल्हापूर इन्स्टिट्युट आॕफ आॕर्थोपिडीक अँड ट्रामा सेंटर व संकल्पसिद्धी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कागल यांचे तज्ञांनी तपासणी केली.

यावेळी आदर्श पोलिस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दला नितीन कांबळे,सर्व आशा व अंगणवाडी सेविकांचा सत्कार अध्यक्षा घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील,शाहूचे संचालक सचिन मगदूम,जवाहर साखरचे संचालक शेखर पाटील,राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत, संचालक अरुण गुरव ,राघू हजारे, बाबासाहेब मगदूम, विक्रमसिंह जाधव,सुदर्शन मजले,शिवसिंह घाटगे,रणदेवीवाडीचे सरपंच राहूल खोत,कार्यकारी संचालक अरुण पाटील आदी उपस्थित होते. 

अमोल शिवई यांनी स्वागत केले. सुहास लगारे यांनी आभार मानले.

युवकांनो गाफीला राहू नका...

ग्रामीण तसेच शहरी भागातील युवक इतक्या लहान वयात मला आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत.असे म्हणून आरोग्य तपासणी,व्यायाम व सकस आहाराकडे दुर्लक्ष करतात.युवकांमध्ये हृदयविकारासह इतर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक युवक अकाली मृत्यू पावत आहेत.याचा फटका कुटुंबीयांना बसतो. याला युवकांची जीवनशैली कारणीभूत असून त्यांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी ,सकस आहार व व्यायाम गरजेचे आहे. असे प्रतिपादन अध्यक्षा घाटगे यांनी यावेळी केले.