‘गोकुळ’ च्या मुंबई येथील नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न

‘गोकुळ’ च्या मुंबई येथील नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न

मुंबई - कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वाशी शाखा (नवी मुंबई) येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानने उभारण्यात आलेल्या ‘१५ मे.टन क्षमतेच्या नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे’ उद्‌घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, मुंबईचे दूध वितरक प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थित गोकुळ डेअरी वाशी (नवी मुंबई) येथे संपन्‍न झाला.

या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळने गुणवत्तेच्या जोरावर साधलेली अभूतपूर्व प्रगती ही कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी, पशुपालक, वितरक आणि संघातील कर्मचाऱ्यांच्या निष्ठा व कष्टांचे फलित आहे. शेतकऱ्यांनी दूध उत्पादन वाढवले आणि गोकुळने त्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली. त्यामुळे गोकुळ आज राज्यातील अग्रगण्य व विश्वासार्ह दुग्ध ब्रँड ठरला आहे. मुंबईतील गोकुळची विक्रीव्यवस्था स्वर्गीय आनंदराव पाटील (चूयेकर) आणि आदरणीय तात्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातून सन १९८८ साली सुरू झाली. त्यानंतर पुणे बाजारपेठही गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या बळावर भक्कम केली. आज या दोन्ही महानगरांमध्ये गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी संकलन व दूध संकलन वाढवण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, “बाजारपेठ विस्तार, गुणवत्ता सुधारणा आणि दूध संकलन वाढ ही काळाची गरज आहे. संघाकडून राबवल्या जाणाऱ्या अनुदान योजना, सेवा-सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.” कर्नाटक सरकार दूध उत्पादकांना प्रतिलिटर रु. ५ अनुदान देते. त्यामुळे त्या राज्यात दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्र सरकारनेही दूध उत्पादकांना अनुदान दिल्यास दुग्धव्यवसाय आणखी मजबूत होईल आणि महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर येईल, असा विश्वास व्यक्त केला. नवीन दही प्रकल्पामुळे गोकुळची मुंबई बाजारपेठेतील क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा उल्लेख करत मंत्री मुश्रीफ म्हणाले, “गोकुळ हा परंपरा, गुणवत्ता आणि विश्वासाचा प्रतीक आहे. त्याला राज्याचा अधिकृत ब्रँड घोषित केल्यास तो राज्यभर अधिक उजळून निघेल.” गोकुळची दीर्घ परंपरा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग, आधुनिक उत्पादन सुविधा आणि व्यापक ग्राहकवर्ग यांच्या आधारे गोकुळला राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड दर्जा मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे आहे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, “गोकुळ हा केवळ दुग्धव्यवसायिकांचा ब्रँड नसून लाखो दूध उत्पादक शेतकरी, वितरक, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्या कष्ट, विश्वास आणि सहकार्याचा परिणाम आहे. गेल्या ४० ते ५० वर्षांत ‘लिक्विड मिल्क’ विभागात गोकुळने निर्माण केलेला विश्वास आज दुग्धजन्य प्रदार्थ (बायप्रॉडक्ट्स) क्षेत्रातही विस्तारत आहे.” ते पुढे म्हणाले, काळाबरोबर बाजारपेठ बदलत आहे. नवी पिढी, आधुनिक डिझाईन, आकर्षक पॅकेजिंग आणि गुणवत्ता या सर्वबाबी आज महत्त्वाच्या आहेत. नवनवीन दुग्धजन्य उत्पादने आणि गुणवत्ता दोन्ही जपण्याचा सातत्याने प्रयत्न गोकुळ करत आहे.

मुंबईमध्ये थेट बाजारपेठेशी जोडणारे गोकुळचे प्रकल्प उभे राहतील व त्या विस्तारासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाटील म्हणाले,“गोकुळ ब्रँड टिकून राहणे म्हणजे शेतकरी कुटुंबांच्या भविष्याचे संरक्षण आहे. शेतकऱ्यांनी दूध उत्पादन टिकवले, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुणवत्ता जपली आणि सर्वांनी मिळून हा ब्रँड राज्यातून देशभर नेण्याचे काम केले हेच गोकुळचे बळ आहे. दूध व दुग्धजन्य उत्पादनांचा बाजार कधीही कमी होणार नाही. पुढील पिढ्यांपर्यंत गोकुळची सावली टिकून राहावी हेच आपले ध्येय आहे.”

या कार्यक्रमावेळी प्रास्ताविक करताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, हा दही प्रकल्प गोकुळच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. सहा कोटी रुपयांत उभारलेल्या या अत्याधुनिक प्रकल्पाची उत्पादन क्षमता १५ मेट्रिक टनांपर्यंत असून या प्रकल्पातून दरमहा जवळपास २५ लाख रुपयांची बचत होणार असल्याने गोकुळच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुणवत्तेबाबत गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. मुंबई-पुणे बाजारात दर्जेदार दही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी आपण सज्ज आहोत. मार्केटिंगच्या गरजा ओळखून नवनवीन उत्पादने बाजारात आणण्याचे काम सुरू असून लवकरच गोकुळचे आईस्क्रीमदेखील ग्राहकांना भेटणार आहे, असे मुश्रीफ सांगितले. गोकुळच्या प्रगतीची दोन चाके म्हणजे उत्पादक आणि ग्राहक आहेत. त्यांच्या विश्वासावरती जास्तीत जास्त दूध संकलन व विक्री टप्पा साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “गोकुळ म्हणजे गुणवत्ता” ही ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.

स्वागतपर भाषणात संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील म्हणाले हा दही प्रकल्प गोकुळच्या ब्रँड मजबुतीचा नवा टप्पा आहे. दूध उत्पादकांचा विश्वास हे आमचे भांडवल असून, गोकुळच्या प्रत्येक प्रकल्पामागील प्रेरणा हा शेतकरीच आहे. ना. मुश्रीफ व आ. सतेज पाटील व आघाडीचे सर्व नेते यांचे मार्गदर्शन आणि संचालक मंडळाचे सामूहिक प्रयत्न यामुळे गोकुळचा वेग सातत्याने वाढत आहे.

या कार्यक्रमाचे स्वागत संघाचे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी केले तसेच प्रास्‍ताविक चेअरमन नविद मुश्रीफ यांनी मनोगत व्‍यक्‍त केले तर आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे स्‍वागत माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी केले व माजी गृहराज्‍यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे स्‍वागत संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.

यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील - चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील, संघाचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मुंबई परिसरातील दूध वितरक,संघाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.