श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसचा आरोप; शरद पवार गटावर विश्वासघाताचा ठपका

श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसचा आरोप; शरद पवार गटावर विश्वासघाताचा ठपका

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील विधानपरिषद निवडणूकीतुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या निर्णयावर टीका केली आहे. विधानपरिषदेची ही जागा कॉंग्रेसने लढवायला हवी होती, मात्र राष्ट्रवादीवर विश्वास ठेऊन महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने आमचा विश्वासघात झाल्याच प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. प्रशांत जगताप हे काही महिन्यांपुर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून कॉंग्रेसमधे दाखल झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

प्रशांत जगताप म्हटलं की, "पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूणच जे काही विरोधक आहेत, त्यांची भाजप किंवा महायुती सरकारच्या विरोधात लढण्याची तयारी होती. इथं आमच्या काँग्रेस पक्षाचा आकडा हा सगळ्यात मोठा होता. काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केला होता. प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्यासोबत सुद्धा या संदर्भात आमची चर्चा झाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने पुण्याच्या जागेवर दावा केला आणि महाराष्ट्रातल्या १७ जागेमध्ये 'फक्त आम्हाला दोनच जागा द्या, पुणे आणि साताऱ्याची' अशा प्रकारे मागणी केल्यामुळे, काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या मनाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली.

त्यावेळेस सुद्धा आमचं या ठिकाणी आग्रही मत होतं की, या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष यापेक्षा काँग्रेस पक्षाच्या मतदारांची संख्या यामध्ये जास्त होती. पण दुर्दैवाने या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने याच्यामध्ये आग्रही भूमिका घेतली, त्यामुळे काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली. पण या ठिकाणी आम्हाला धोका झालेला आहे.

 ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस, भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेर माघारी सुद्धा घेतला. हा आमचा एक विश्वासघात आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा हा विश्वासघात झालाय अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे. इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.