विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक: विक्रमी विजयानंतर मन भरून आलं
पुणे (प्रतिनिधी) : बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात असलेल्या २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना ४८३७ इतकी मते मिळाली. बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेला मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला आहे, विक्रमी मतांनी सुनेत्रा पवारांचा बारामतीच्या पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान घ्यावे लागले. या निकालाची औपचारिकता बाकी होती. कार्यकर्ते, पार्थ पवार आणि जय पवारांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवारांना विक्रमी मते मिळाली आहेत. या विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले आहेत.

सुनेत्रा पवार बोलताना म्हणाल्या, दादांनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा निवडणुकीला सामोरं जावं लागेल, मन खरं तर खूप भरून येत आहे. पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकासकामावरचं प्रतिक म्हणून आज त्यांना भावांजली वाहिलेली आहे असं मी म्हणेन, बारामतीकरांनी दिलेलं मतदान हे दादांवरील विश्वास त्यांनी आजवर केलेली कामे, सेवा आणि जनतेवरचं प्रेम हे जनतेने त्यांच्या मतातून मला दिलं असं मी मानते आहे.
बारामतीकरांनी जे मतदान केलं आहे, त्यावरून अजित दादांवरचा अढळ विश्वास त्यांनी देखील माझ्या पाठीमागे अढळपणे उभा केला आहे, असं चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास त्यांनी दाखवला आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते, माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे, बारामतीकरांना दादांनी जी विकास कामांची स्वप्ने दाखवली ती पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय ते त्यांनी मताद्वारे दाखवले आहे. ती कामे पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असंही पुढे सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.
२४ च्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय झाला आहे. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, जय पवार आणि पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडणून देण्याचं आवाहन केलं होतं, त्याचबरोबर सर्व पक्षांनी आणि संघटनांनी देखील सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला होता, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवारांला शंभर मते देखील पडली नसल्याचं दिसून येत आहे.
बारामती पोट निवडणुकीतील सर्व मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना मिळालेले हे मताधिक्य आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे २०२२ साली २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला आहे, असं सांगितलं जात आहेत.




