वोट चोरी करून सत्तेवर आलेल्या सरकारला त्यांची जागा दाखवून द्या - बी. एम. संदीप
कोल्हापूर (प्रतिनिधी) - भाजप सारखे भ्रष्टाचारी सरकार यापूर्वी सामान्य जनतेने कधीही पाहिले नाही. वोट चोरी करून हे सरकार सत्तेवर आले असून, या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्या. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच कामाला लागा असे आवाहन काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बी. एम. संदीप यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीत बैठक आयोजित करण्यात आली होती. खा. शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीसाठी, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी बी. एम. संदीप, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बी. एम. संदीप यांनी भाजपने यापूर्वी आमदार आणि खासदारांना फोडून सत्ता मिळवली. आता वोट चोरी करून भाजप सरकार सत्तेवर आल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. कर्नाटक महाराष्ट्र हरियाणा येथील वोट चोरीचे प्रकार काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी उघड केलेत. शिवाय भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, सरकारी भूखंड लाटणे असे अनेक कारनामे भाजप सरकारचे उघड होत असून, सरकार चालवण्यास महायुतीचे सरकार अपयशी ठरत असल्याची टीकाही काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी बी. एम. संदीप यांनी केली.
काँग्रेस पक्षाने नेहमी जनसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय.. 2019 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे चार विधानसभा आमदार आणि एक विधान परिषदेचे आमदार असे पाच आमदार होते. आता काहीस अपयश आले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी मिळून कामाला लागूया. मतदार याद्या तपासा, त्याची माहिती घ्या. बोगस मतदारावर लक्ष ठेवा असे आवाहनही त्यांनी केले.
खा. शाहू महाराज छत्रपती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नाव लवकरच जाहीर करू. स्थानिक प्रश्न समजून घेऊन, हे चूक आणि लोकांच्या पर्यंत पोहोचावे. काँग्रेसचे विचार घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊया. कार्यकर्त्यांनी आपापसात कोणतेही मतभेद ठेवू नये असेही खा. शाहू महाराज यांनी सांगितले.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आमची तयारी पूर्ण झाली असल्याच त्यांनी सांगितले. ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी स्थानिक आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत युती करणार असल्याचही त्यांनी सांगितले. वोट चोरी करून भाजप सरकार सत्तेवर आल आहे. काँग्रेसची सत्ता नसतानाही इच्छुकांची संख्या काँग्रेसकडून मोठी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 55 हजार मते दुबार आहेत. आपापसातील मतभेद विसरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करा. ताकतीने या निवडणुकीला सामोरे जाऊ असे आवाहनही त्यांनी केले.
आ. जयंत आसगावकर यांनी, महायुती बद्दल जन सामान्य लोकांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागूया असे आवाहन केले.
माजी आ. राजूबाबा आवळे यांनी, आमची सत्ता नसतानाही काँग्रेस कडून अनेक जन इच्छुक आहेत. विरोधकांचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. लोकांच्या पर्यंत आपण पोहचूया निष्ठावंत आणि निवडणून येणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देऊ. असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राधानगरी तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी मध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, माजी नगरसेवक राजेश लाटकर, दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे, बाळासाहेब सरनाईक, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, संचालक बयाजी शेळके, शशिकांत पाटील चुयेकर, संजय मोहिते, राहुल माने, प्रवीण केसरकर, संदीप नेजदार, मधुकर रामाणे, प्रताप जाधव, अर्जुन माने, भारती पोवार, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.




