नीलम गोऱ्हे-बच्चू कडू नको; विधान परिषदेसाठी ‘त्यांना’ संधी – शिंदे मंत्री

नीलम गोऱ्हे-बच्चू कडू नको; विधान परिषदेसाठी ‘त्यांना’ संधी – शिंदे मंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. 

विधान परिषदेत कुणाला संधी द्यायची, यासाठी राज्यातील सर्व पक्षांकडून हालचाली सुरु आहे. काही दिवसांआधी शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर आली होती. तर माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू  यांना शिवसेनेने विधान परिषदेसाठी ऑफर दिल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवण्यावरुन शिवसेनेतचं नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर आहेत. मात्र या दोघांच्या नावावर शिंदेंचे मंत्री आणि नेत्यांनीच विरोध दर्शवला आहे. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, असा अनेकांचा सूर आहे. नीलम गोऱ्हे यांच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेतील नेत्यांचा विरोध आहे. तर  बच्चू कडू यांचा शिवसेनेशी काय संबंध? असाही पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. उमेदवारी द्यायची झाल्यास बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेने एक अट ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रहार संघटना ही शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्तावही शिवसेनेकडून बच्चू कडू यांना दिल्याचे कळते. 

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी दोनवेळा मतदान करावं लागणार आहे. 9 जागांसाठी एकदा मतदान होणार तर प्रज्ञा सातव यांची रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान होईल. दोन्ही मतदान जरी एका दिवशी होणार असलं, तरी आमदारांना दोन वेळा मतदान करावं लागणार आहे. 9 जागांसाठी 29 चा कोटा असणार आहे. तर एका जागेसाठी 51 टक्के मतांची मर्यादा असणार आहे. या समीकरणामुळे 10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येणार तर महाविकास आघाडीला 1 जागेवर समाधान मानावं आहे.