महाविकास आघाडी स्वाभीमानीसह जिल्ह्यात निवडणूका एकत्र लढणार - आ. सतेज पाटील
जयसिंगपूर - जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी, इंडिया आघाडी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी लोकांना एकत्र घेऊन ताकदीने निवडणूक लढविणार आहोत असे मत आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांनी जाहीर केले. या निवडणुकीत "बिन आवाजाचा बॉम्ब फुटेल, असा टोला यावेळी विधान परिषदेतील विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या वतीने हॉटेल शानवी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी दत्तू उद्योगसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, अनिल यादव, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे, राज्यसंघटक चंगेजखान पठाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, पृथ्वीराज यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून निवडणूका रखडल्या आहेत. सुप्रिम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे निवडणूक होत आहे. आमचे तुमचे नशीब म्हणायचे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे दोन चाक आहेत परंतु गेल्या काही वर्षापासून निवडणुका न घेतल्याने प्रशासनामध्ये अनियमितता तसेच मनमानी कारभार झाला आहे. दरम्यान देशातील तसेच राज्यातील वातावरण भ्रष्टाचारी तसेच जमिनी हडपणारे झाले आहे. निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या शपथ पत्रात सत्तेतील लोकांच्या प्रॉपर्टीत वाढ झाल्याचे दिसून येईल. असे टोला आ. पाटील यांनी लगावला.
तसेच अनेक जमिनी हडपल्या जात आहेत. त्यामुळे महिन्याला आपली नावे आपल्या जमिनीला आहेत की नाही हे बघा असे सांगत शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर तिन्ही गावात एकत्रित आघाडी म्हणून निवडणूक लढविणार. काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर तर काही ठिकाणी आघाडी म्हणून निवडूक लढविणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगीतले.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी नगरपालिका निवडणुकीत समविचारी पक्षांना एकत्र घेऊन आम्ही निवडणुका लढविणार आहे असे सांगितले. आमच्यासोबत वंचित आघाडी आम आदमी हे ही सोबत येतील.
आम्ही एकदिलाने एकजुटीने हि निवडणूक लढविणार आहे. जयसिंगपूर शहरातील प्रस्थापित लोकांना आता सुट्टी नाही. तर गणपतराव यांची मला साथ आहे.जिल्हा परिषद असो नगरपालिका एकदिलाने लढविणार आहे. शहरालगत जमीनीवर आरक्षण टाकून पैसे मिळवायचे हे धंदे सुरू आहे. हि निवडणूक धनशक्ती विरूध्द जनशक्ती आहे. भूयारी गटार योजना फसलेली आहे. जयसिंगपुरात नगरपालिका इमारत बांधकाम, लाईट घोटाळा बाहेर काढला आहे . जयसिंगपूर शहरातील रस्त्यांची अवस्था बघता विकासाचा डोंगर दुर्बिण घेवून शोधण्याची गरज आहे असा आरोप राजू शेट्टी यांनी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर , माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे नाव न घेता केला.
यावेळी बोलताना गणपतराव पाटील यांनी शिरोळ, कुरूंदवाड, जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत खंबीरपणे लढविणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांला न्याय या निवडणुकीत देणार असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, वैभव उगळे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सूर्यकांत पाटील, अशोक कोळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष दरगू गावडे, युनुस डांगे, उदय पाटील, संजय अनुसे, सचिन शिंदे, बंडू उमडाळे, आय. आय. पटेल, ऋषीराज शिंदे, संतोष जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष योगिता घुले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मेघा गायकवाड, बाबासाहेब सावगावे, विशाल जाधव, डि.पी.कदम,संदीप हवालदार, दयानंद मालवेकर, सचिन शिंदे, सुजाता शिंदे, अमरसिंह निकम, नितीन बागे, राजू आवळे, रावसाहेब दानोळे, सुर्यकांत पाटील बुध्दिहाळकर, शेखर पाटील सर्जेराव पवार, स्वाती सासणे, बंडा मणियार, विश्वजीत कांबळे, चंद्रकांत पाटील घुणकीकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.




