"शेवटी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीराम आठवले याचा आनंद"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

"शेवटी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीराम आठवले याचा आनंद"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

चंद्रपूर/मुंबई: अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर संस्थानातील कथित चोरी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईत 'रामरक्षा' आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. "शेवटी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीराम आठवले, याचा मला आनंद आहे," असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. ते चंद्रपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, "आमची अपेक्षा एवढीच होती की उद्धव ठाकरेंना राम आठवले पाहिजेत. त्यांनी रामाचा मार्ग सोडल्यामुळेच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. आता राम मार्गाने चालले तर त्यांचे भले होईल. त्यांनी केवळ एकदाच नाही, तर रोज रामरक्षा म्हणावी, हीच माझी अपेक्षा आहे." मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक मारुती मंदिरासमोर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

हे चोरून राज्य करताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवताय: संजय राऊत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. "हिंदुत्वासाठी आंदोलन सुरू आहे, तर सत्ताधाऱ्यांनी त्यात सामील व्हायला हवे. राम मंदिरामध्ये उघडपणे लूट आणि दरोडे सुरू आहेत. प्रभू श्रीरामाचा मुकुट, पादुका, कर्णफुले आणि सीतामाईची २७ मंगळसूत्रे चोरीला गेली आहेत. तिथे कोणी अब्दुल किंवा रहिम चोरी करायला आले नव्हते, तर मिश्रा, दुबे, राय यांनीच ही चोरी केली आहे," असा गंभीर आरोप राऊतांनी केला.

सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करताना राऊत म्हणाले, "हे स्वतः चोरून राज्य चालवत आहेत आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत? अशी श्रीरामाची लूट करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी विष खाऊन मेले पाहिजे. हे सत्ताधारी दुर्योधनवादी आहेत आणि त्यांचा बाप दुर्योधन आहे," अशा अत्यंत कडक शब्दांत राऊतांनी पलटवार केला आहे. या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.