कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा,भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल
मुंबई (प्रतिनिधी) : भारताने आपल्या अणूऊर्जा कार्यक्रमात 'कलपक्कम' येथे स्वदेशी 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर' (PFBR) यशस्वी करून इतिहास रचत संपूर्ण जगालाच आश्चर्याचा धक्का दिला. या यशाबद्दल भारतावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण, पाकिस्तानला मात्र प्रचंड धडकी भरली आहे. "या नव्या क्षमतेमुळे भारत आता वेगाने प्लुटोनियम अणुबाँबची निर्मिती करू शकतो," असा आरोप पाकिस्तानचे 'आर्म्स कंट्रोल अॅडव्हायजर' जाहीर काझमी यांनी केला आहे.

काझमी यांच्या मते, "'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिअॅक्टर' (PFBR) शस्त्रास्त्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लुटोनियमच्या उत्पादनात लक्षणीय वाढ करेल. भविष्यात, भारताकडे दरवर्षी ३०० अण्वस्त्रे तयार करण्याची क्षमता असेल." महत्वाचे म्हणजे, भारताच्या या नव्या PFBR मुळे पाकिस्तानचे धाबे दणानले आहेत.
जाहीर काजमी यांनी केवळ स्वतःपुरती अथवा पाकिस्तानपुरतीच भीती व्यक्त केली नाही, तर त्यांनी युरोपीय देशांमध्येही भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारताकडे असलेल्या अण्वस्त्रांचा साठा आणि 'अग्नी-५' व आगामी 'अग्नी-६' यांसारख्या ८००० किमीपेक्षा जास्त पल्ला असलेल्या क्षेपणास्त्रांमुळे युरोपचा अंतर्भागही भारताच्या टप्प्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, २००८ मध्ये भारताला मिळालेल्या NSG सूटचा उल्लेख करत, जाहिर काझमी म्हणाले, त्यांनी जो फ्रँकस्टीन राक्षस तयार करण्यात मदत केली, तो आता आणखीनच मोठा होत चालला आहे. आता थोड्याच कालावधीत त्या निर्णयाच्या परिणामांकडे दुर्लक्ष करणे अवघड होईल."
पाकिस्तानला भारताच्या नौदल अण्वस्त्र क्षमतेची सर्वाधिक भीती वाटत आहे. जाहिर काझमी यांनी सोशल मीडियावर लिहिले, "भारताच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या 'अरिहंत' श्रेणीतील अणू पाणबुड्या आणि ३,५०० किमी पल्ला असलेल्या 'K-4 SLBM' सारखी क्षेपणास्त्रे हिंदी महासागराच्या पलीकडेही हल्ला करण्याची क्षमता ठेवतात."




