अशोक खरातवर जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला ठार मारल्याचा आरोप
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहेत. आता एका शेतकऱ्याची जमिनीसाठी हत्या केल्याचा आरोप गवळणे येथील एका शेतकऱ्याने केला. आपल्या भावाची हत्या या खरातने केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला.

मिळालेल्या माहितीनुसार, गवळणे येथील शेतकरी कैलास जाधव यांच्या कुटुंबाचा आणि अशोक खरात याचा जमिनीवरून वाद सुरू होता. कैलास जाधव यांनी केलेल्या आरोपानुसार, खरात याने फसवणूक करून जमीन बळकावली होती. या वादावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. पण न्यायालयाचा अंतिम निकाल अवघ्या दोन दिवसात येणार होता, तेवढ्यात जाधव यांच्या भावाचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला.
२०२२ या वर्षी विलास जाधव यांच्या भावाने अशोक खरात याच्याविरोधात पोलिसांत धाव घेऊन जीविताला धोका असल्याची तक्रार दिली होती. मात्र अशोक खरात याचे बड्या राजकीय नेत्यांशी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते, असाही आरोप जाधव यांनी केला. दरम्यान, आता या प्रकरणाची चौकशी करुन तपास करण्याची मागणी होत आहे.
अशोक खरात याने नाशिकच्या पाथर्डी परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. जाधव कुटुंबीयांनाही या खरातने त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.




