‘गोकुळ’ च्या रक्षाबंधन परंपरेतून २० वर्षांचा ऋणानुबंध जपला...

‘गोकुळ’ च्या रक्षाबंधन परंपरेतून २० वर्षांचा ऋणानुबंध जपला...

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गोकुळने सहकार्य केलेल्या निराधार महिलांच्या कडून रक्षाबंधन निमित्त राखी बांधून घेण्याची परंपरा २००५ साली तत्कालीन चेअरमन विश्वास पाटील यांनी सुरु केला असून त्यांनी व सहकारी संचालकांनी गेली २० वर्ष तो जपलेला आहे. त्यानुसार आज संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील व संचालक युवराज पाटील यांना रक्षाबंधन निमित्त राजापूर ता.शिरोळ येथील  भारती चिंचणे व बेलवले, ता.कराड येथील वैशाली शिंदे यांनी राखी बांधून ऋणानुबंध जपले हा कार्यक्रम गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे पार पडला.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना वैशाली शिंदे यांनी गोकुळचे अशिर्वाद माझ्या सारख्‍या अनेक निराधार महिलाना लाभले आहेत. गोकुळचा ऋणानुबंध जिवनात नवीन अशा आकांक्षा निर्माण करणारा असून गोकुळचे हे ऋण याजन्मी न फिटणारे आहे. गोकुळ परिवारास माझ्या सारख्या अनेक निराधार महिलांचे आशीर्वाद लाभोत व विश्वात गोकुळचे नाव उज्वल होवो अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. एड्स सारख्या असाध्य रोगाची लागण झाल्यामुळे जीवन उध्वस्त झालेल्या वैशाली शिंदे या प्रबोधनच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृतीचे काम गेली २१ वर्ष अव्याहतपणे करत आहेत. अश्या भावना वैशाली शिंदे रक्षाबंधन निमित्त राखी बांधताना व्यक्त केल्या .                     

राजापूर, ता. शिरोळ येथील महिला भारती चिंचणे यांचे पती २००५ च्या महापुरात वाहून गेले. एवढेच नाही तर त्यांचे राहते घर व जनावरे देखील या पुरात वाहून गेलीत. त्यांचेवर कोसळलेला दु:खाचा डोंगर सावरण्यासाठी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी भारती चिंचणे यांना घर बांधण्यासाठी त्यावेळी गोकुळमार्फत आर्थिक सहाय्य करून त्यांच्या जीवनात जगण्याची उमेद निर्माण केली.याची जाण ठेवून भारती चिंचणे व वैशाली शिंदे यांनी गेली २० वर्षे गोकुळचे व आपले ऋणानुबंध रक्षाबंधनाच्या निमित्ताने जपलेले आहेत.

 यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, दीपक पाटील आदी उपस्थित होते.