पंतप्रधान मोदींच्या भाषणावर खा. संजय राऊत म्हणाले, मोदींचं भाषण म्हणजे...

पंतप्रधान मोदींच्या भाषणावर खा. संजय राऊत म्हणाले,  मोदींचं भाषण म्हणजे...

मुंबई - सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर' या महत्त्वाच्या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत आपल्या भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या भाषणावर सडकून टीका केली आहे. खा. राऊत म्हणाले, “मोदींचं भाषण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत सांगायचं तर ‘रुदाली रडगाणं’ होतं. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची भाषणं ऐका. राज्यसभेत खर्गे यांनी जे मुद्दे मांडले त्यावर पंतप्रधान, गृहमंत्री किंवा संरक्षणमंत्र्यांकडे ठोस उत्तर नव्हतं. केवळ खोटं बोलणं सुरू आहे.”

खा. राऊत यांनी पंतप्रधान मोदींनी भाषणात डोनाल्ड ट्रम्प किंवा चीनचा उल्लेख न केल्यावरही प्रश्न उपस्थित केला. “मोदी म्हणतात माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता, कोणाशी चर्चा झाली नाही. पण त्याच वेळी ट्रम्प म्हणतात त्यांनी युद्ध थांबवलं. मग ट्रम्पचं नाव घेण्यात सरकारला काय अडचण आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विधीमंडळात ‘रमी’ खेळल्याचा आरोप झाला असून, तरीही त्यांचा राजीनामा न घेतल्याबद्दलही टीका करण्यात येत आहे. यावर बोलताना खा. राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात आता नवीन कायदा लागू झाला आहे. ‘फडणवीस Act’. समज द्या आणि सोडून द्या. काही मंत्र्यांना समज दिली जाते आणि ते लगेच सुटतात.”

विधानसभेच्या अहवालानुसार मंत्री कोकाटे यांनी २० मिनिटे गेम खेळल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर खा. राऊत म्हणाले, “अशा अहवालांना फडणवीस किंवा विधानसभा अध्यक्ष किती महत्त्व देतात, हे त्यांनाच विचारायला हवं. कारवाईचं पुढे काय होतं? अंदाज समितीचा अध्यक्ष लाच घेताना सापडतो, तरी त्याला वाचवलं जातं. यालाच ‘फडणवीस Act’ म्हणावं लागेल. आपल्या लोकांना वाचवायचं आणि इतरांना तुरुंगात टाकायचं,” असा घणाघातही खा. राऊतांनी केला.