रायगडमधील बडा नेता काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेशाच्या तयारीत

रायगडमधील बडा नेता काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेशाच्या तयारीत

रायगड - गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांच्या पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. याच प्रवाहात आता रायगड जिल्ह्यातील माजी आमदार मधुकर ठाकूर उर्फ मधूशेठ यांचे ज्येष्ठ पुत्र आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण मधुकर ठाकूर हे काँग्रेसचा झेंडा खाली ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राष्ट्रवादी अजित पवार गट) घड्याळाचा स्वीकार करण्याच्या तयारीत आहेत.

प्रवीण ठाकूर यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत सांगितले, "सध्या काँग्रेसमध्ये कुठलाही समन्वय उरलेला नाही. कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसकडे रायगड आणि कोकणसाठी स्पष्ट दिशा आणि धोरण आहे." त्यामुळेच त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

२ ऑगस्टला अधिकृत प्रवेश - 

अॅड. प्रवीण ठाकूर येत्या २ ऑगस्ट रोजी अलिबागमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

राजकीय उलथापालथीची शक्यता - 

अॅड. प्रवीण ठाकूर हे रायगड जिल्ह्यातील एक प्रभावशाली नेते मानले जातात. २००९ साली त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करत लोकसभा निवडणूक लढवली होती. तसेच अलिबाग नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशामुळे अलिबाग मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकूर कुटुंबात तिसरा पक्ष - 

प्रवीण ठाकूर यांचे धाकटे बंधू पिंट्या ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. आता प्रवीण ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होत असल्याने त्यांच्या कुटुंबात काँग्रेस, शिवसेना (उ.बा.ठा.) आणि राष्ट्रवादी असे तिन्ही वेगवेगळे पक्ष झाले आहेत.

रायगडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार - 

अलीकडेच माणगावचे शिवसेना नेते अॅड. राजू साबळे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता प्रवीण ठाकूर यांच्या प्रवेशामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी मजबूत होणार असून काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.