"लष्कराची सेवा करणारे वांगचुक देशद्रोही कसे?" उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना थेट सवाल; संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही उठवले प्रश्नचिन्ह

"लष्कराची सेवा करणारे वांगचुक देशद्रोही कसे?" उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना थेट सवाल; संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही उठवले प्रश्नचिन्ह

मुंबई : "जे सरकार तरुणांना रोजगार आणि शिक्षण देऊ शकत नाही, ते 'दळभद्री' सरकार आता सत्तेवरून खेचून काढण्याची वेळ आली आहे," अशा तीव्र शब्दांत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. "आता केवळ कार्यकर्ते म्हणून गप्प बसू नका, तर स्वतः नेते बना आणि ही हुकूमशाही राजवट भस्म करून टाका. या लोकांनी तुमचे भविष्य चोरले आहे, त्यामुळे मनात पेटलेली ही आक्रोशाची आग सरकार बदलेपर्यंत विझू देऊ नका," असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शिवसेनेने (UBT) जाहीर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान बोलताना उद्धव ठाकरेंनी केवळ भाजपवरच नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) भूमिकेवरही सडकून टीका केली.

सैनिकांचे हित जपणारे वांगचुक चीनचे हस्तक कसे?

सोनम वांगचुक यांच्या कार्याचा गौरव करत उद्धव ठाकरे म्हणाले, "एकदा हिशोब होऊनच जाऊ दे की देशासाठी वांगचुक यांनी काय केले आणि या दळभद्री सरकारने काय केले! उणे तापमानात बर्फात देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी 'सोलर कॅम्प' बनवले. लडाखमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कृत्रिम 'आइस माउंटेन' उभे केले. अशा देशभक्ताला आजचे सरकार चक्क 'देशद्रोही' आणि 'चीनचे हस्तक' ठरवत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे."

भागवत-होसबळेंना थेट सवाल; हेच का तुमचे 'हिंदू राष्ट्र'?

संघाचे नेते दत्तात्रेय होसबळे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानांचा दाखला देत ठाकरेंनी विचारले, "आपल्या सैनिकांचे रक्त सांडणाऱ्या पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास संघाचे नेते तयार आहेत. मग जे वांगचुक अहोरात्र देशासाठी आणि सैन्यासाठी झटत आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला हे सरकार का नकार देत आहे? आज देशात जी हुकूमशाही आणि दडपशाही सुरू आहे, तेच संघाच्या कल्पनेतील 'हिंदू राष्ट्र' आहे का?" असा थेट सवाल त्यांनी मोहन भागवतांना केला.

मनमोहन सिंग आणि मोदी सरकारमधील तुलना 

काही वर्षांपूर्वीच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले, "अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते, तेव्हा त्यांना देशभरातून पाठिंबा मिळाला. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अण्णांना देशद्रोही म्हटले नाही, तर सन्मानाने चर्चा करण्यासाठी विलासराव देशमुखांना पाठवले होते. मात्र, आजच्या सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटून केवळ दडपशाही सुरू आहे."