पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. नाशिकचे बहुचर्चित खरात प्रकरण, आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण, परतवाडा आणि गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांच्या तपासाची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. या बैठकीला पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी (SIT) प्रमुख आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाला महत्त्वाचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

अशोक खरात प्रकरणात फडणवीस यांनी पीडित महिलांच्या सुरक्षिततेवर भर दिला. पीडितांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणात कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल, यासाठी भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हा महत्वाचा घटक असला पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. धर्मांतरासारखे प्रकार हे अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले, त्यांचे अभिनंदन. पण, आता तितकाच दमदार तपास झाला पाहिजे. यात प्रकरणात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा. कोणताही ॲंगल तपासातून सुटू नये, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.
मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करा. तरुणाईच्या भविष्याशी निगडित ही बाब आहे, त्यामुळे अशी प्रकरणे एकदम गांभीर्याने घ्या, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.




