बांगलादेशच्या निर्णयाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, PSL वर काळं सावट

बांगलादेशच्या निर्णयाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, PSL वर काळं सावट

मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमाभागात तणाव शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांमध्ये हल्ल्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डने (BCB) आपल्या खेळाडूंना पाकिस्तानला PSL 2026 साठी पाठवण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता खेळाडूंनी PSL मध्ये सहभागी व्हायचं की नाही, याचा अंतिम निर्णय सरकारच्या मंजुरीनंतरच घेतला जाणार आहे.

बांगलादेशच्या सहा खेळाडूंना मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमॉन, शरीफुल इस्लाम, नाहिद राणा, तनजीद हसन तमीम आणि रिशाद हुसेन यांना आधीच पीएसएल साठी एनओसी (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) देण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या फ्रँचायझीसाठी निवडले गेले आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, बीसीबीने स्पष्ट केलं आहे की सरकारची परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला पाकिस्तानला पाठवलं जाणार नाही.

बीसीबीचे क्रिकेट ऑपरेशन्स चेअरमन नजमूल अबेदीन यांनी स्पष्ट केलं की सध्या परिस्थिती सामान्य नाही. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सरकारचा सल्ला घेतला जाईल. सरकारने प्रवास सुरक्षित असल्याचं मान्य केल्यासच खेळाडूंना PSL मध्ये खेळण्याची परवानगी दिली जाईल.

जर खेळाडूंना पीएसएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळाली, तर त्याचा परिणाम बांगलादेशच्या न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेवर होऊ शकतो. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी होणाऱ्या सराव शिबिरात हे खेळाडू सहभागी होऊ शकणार नाहीत. या मालिकेत बांगलादेशला 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीबीने खेळाडूंना NOC दिला आहे, जेणेकरून ते पीएसएल आणि आंतरराष्ट्रीय मालिका दोन्हीमध्ये सहभागी होऊ शकतील. मुस्तफिजुर रहमानला 26 मार्च ते 12 एप्रिल आणि पुन्हा 24 एप्रिल ते 3 मे पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तंजिद, शोरिफुल, राणा आणि रियाद यांना 12 एप्रिलपर्यंत एनओसी देण्यात आली आहे. दरम्यान, परवेझ हुसेनला 21 एप्रिलपर्यंत परवानगी देण्यात आली असून तो फक्त टी-20 मालिका खेळेल.

सध्या हा संपूर्ण निर्णय सरकारच्या मंजुरीवर अवलंबून आहे. परिस्थिती अनुकूल राहिल्यास हे खेळाडू पीएसएलमध्ये खेळताना दिसतील; अन्यथा त्यांना राष्ट्रीय संघाची जबाबदारी पार पाडावी लागेल.