LPG तुटवड्यामुळे हजारो मजूर परतले घरी,अनेकांना कोरोना काळाची आठवण

LPG तुटवड्यामुळे हजारो मजूर परतले घरी,अनेकांना कोरोना काळाची आठवण

मुंबई (प्रतिनिधी) : अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अद्यापही सुरूच आहे. कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. या युद्धामुळे जगातील अनेक देशांना मोठा फटका बसला असून, अनेक बाबतीत नुकसान सोसावे लागत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबाबत अनेक दावे केले आहेत. पंरतु, त्यापैकी बहुतांश दावे फोल ठरत असल्याचे पाहायला मिळत आहेत. भारतालाही या युद्धाची झळ बसली आहे. एलपीजी गॅस तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. गॅस टंचाईचा फटका व्यापाराला बसत आहे. कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हजारो मजूर आपापल्या गावी घरी परत जात असल्याचे म्हटले जात आहे. 

अमेरिका इराण युद्धाचा मोठा परिणाम भारतातील औद्योगिक शहरांमध्ये दिसून येत आहे. गुजरातच्या सुरतमध्ये गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे मोठ्या संख्येने स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यास भाग पडले आहे. स्थानिक एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा परिणाम लहान उद्योग आणि कारखान्यांवरही झाला आहे. या तुटवड्यामुळे अनेक कारखाने तात्पुरते बंद होत आहेत. कामगार रोजगार आणि उपजीविकेच्या संकटाचा सामना करत आहेत.

गॅसच्या समस्येमुळे माझ्या गावी परत येत आहे. आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही जी काही मजुरी करतो आणि त्यात ५००-१००० रुपये मिळतात. तेही आता आम्हाला मिळत नाही आणि गॅसही मिळत नाही. गेल्या १५ दिवसांपासून आम्हाला गॅस मिळत नाही. आठवड्याभरापूर्वी गॅस संपला आणि त्यानंतर गॅसचा तुटवडा निर्माण झाला. आम्ही एजन्सीमध्येही गेलो होतो, पण अजून गॅस मिळालेला नाही. मी आणि माझी मुलगी जात आहोत, तर माझे पती आणि दोन मुले इथेच राहणार आहेत. आम्हाला छोटे सिलेंडरसुद्धा मिळत नाहीत, अशी व्यथा मजुरी करणाऱ्या सीमा देवी यांनी कथन केली. 

गेल्या काही दिवसांपासून आम्हाला गॅस मिळत नसल्यामुळे आम्ही आमच्या गावी जात आहोत. आमच्या कंपन्याही बंद होत आहेत. मग आम्ही काय करणार? आम्ही उपाशी आहोत. आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणून आम्ही गावी परतत आहोत. आम्ही गॅस मिळवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक जण फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत आहे. इथे कोणीही मदत करत नाही. गॅसपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावरच आम्ही परत येऊ. बरेच लोक परत जात आहेत, असे मजुरी करणाऱ्या सचिनने सांगितले.