भटक्या कुत्र्यांचा हादरवणारा हल्ला, महिलेला केले ठार

भटक्या कुत्र्यांचा हादरवणारा हल्ला, महिलेला केले ठार

पुणे (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील चाकण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेठाण चौक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. शोभा विजय वाघमारे असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी होत्या. सध्या त्या चाकण परिसरात राहत होत्या.

16 मार्च रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात असताना सुमारे सहा भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा थरार कैद झाला असून महिलेने दगड उचलून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांच्या झुंडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. कुत्र्यांनी हात, पाय, तोंड आणि मानेवर गंभीर जखमा केल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सुमारे पंधरा मिनिटांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी स्थानिकांना विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला खून किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. 

पूर्वी भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रामुख्याने रात्री उशिरा किंवा पहाटे व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना व्हायचा. मात्र, आता परिस्थिती बदलली असून दिवसाही नागरिकांवर, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांवर कुत्र्यांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रभर भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.