दिंडीच्या मार्गावर प्रसाद वाटपाच्या ठिकाणी किमान २ ते ३ मोठ्या कचराकुंड्या ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : येत्या शनिवारी शहरात नंदवाळला जाण्यासाठी दिंडीचे आगमन होत असून दिंडी मार्गावर अनेक भाविक, सामाजिक संस्था, मंडळे व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रसादाचे वाटप करण्यात येते. या उपक्रमादरम्यान परिसराची स्वच्छता राखणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याने प्रसाद वाटप करणाऱ्या सर्वांनी दिंडी मार्गावर स्वच्छता ठेवावी, महानगरपालिकेमार्फत येणाऱ्या वाहनामध्ये डस्टबिन मोकळे करावे, पाठोपाठ गाडी आहे. इतर ठिकाणी किंवा स्टॉलच्या मागे कचरा टाकू नये असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

महापालिकेने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक प्रसाद वाटपाच्या स्टॉलवर किमान २ ते ३ मोठ्या कचराकुंड्या (डस्टबीन) ठेवाव्यात. तसेच नागरिक व वारकऱ्यांनी कचरा डस्टबीनमध्येच टाकावा, यासाठी आयोजकांनी प्रसाद देताना जनजागृती करावी. या ठिकाणी सिंगल युझ प्लास्टिक, प्लास्टिकच्या पिशव्या, वाट्या व प्लास्टिक ग्लासचा वापर पूर्णपणे टाळावा. त्याऐवजी पत्रावळी, द्रोण, झाडांची पाने किंवा कागदी (पेपर) प्लेट्स यासारख्या पर्यावरण पूरक साहित्याचाच वापर करावा.
सदरची दिंडी मार्गस्थ या परिसरात पडलेला कचरा तात्काळ गोळा करून परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवाव. "स्वच्छता हीच ईश्वरसेवा" या भावनेतून वारकऱ्यांची सेवा करताना दिंडी मार्गाचे सौंदर्य, स्वच्छता आणि पर्यावरण जपण्यासाठी सर्व नागरिक, संस्था व मंडळांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




