बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग
पुणे (प्रतिनिधी) : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, अशी हालचाल सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी गाठीभेटी, फोनाफोनी सुरू होती, आता अखेर आज दुपारी काँग्रेस आपला अर्ज परत घेणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस उमेदवार बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेईल, अशी विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सोबत काल सर्वप्रमुख नेत्यांची चर्चा झाली, अनेकांनी आपली भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत व्यक्त केली. माघार घेतली पाहिजे अशी अनेकांची भूमिका होती. आता प्रदेशाध्यक्ष सर्व नेत्यांची भावना केंद्रीय श्रेष्ठींना कळवतील, त्यांच्या परवानगी दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याचा निर्णय होईल अशी शक्यता आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत शरद पवारांची चर्चा झाल्यानंतर बारामतीमधे आपला उमेदवार मागे घेत असल्याचं खर्गे यांचं शरद पवारांना आश्वासन दिल्याची माहिती आहे. एक तासापूर्वी दोघांतील चर्चेनंतर निर्णय झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. एक तासापुर्वी दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाली, त्यानंतर आता काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तर याबाबतची माहिती काही वेळात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याबाबतची घोषणा करतील तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांचा उमेदवार अर्ज माघारी घेईल अशी माहिती आहे.
बारामतीतील पोटनिवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अर्ज परत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिलेले आहेत. याच काळामध्ये राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी शरद पवार यांनी चर्चा केली आहे त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा करत विनंती करत बारामतीतील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हटले, त्याचबरोबर काँग्रेसमध्ये अंतर्गत खलबतं देखील सुरू झाली आहेत.




