17 सप्टेंबर पासून जिल्हयात स्वच्छता ही सेवा मोहिम - मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस्.
कोल्हापूर (प्रतिनिधी) - स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा - 2 अंतर्गत जिल्हयात दरवर्षी स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित केला जातो. 2017 पासून सुरु असलेला हा उपक्रम स्वयंसेवी वृत्ती आणि सामूहिक कृतीला चालना देण्यासाठी महत्वाचा ठरला आहे. यंदाही हा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छोत्सव या थीमखाली साजरा करण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस्. यांनी केले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार, स्वच्छता ही सेवा 2025 हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच विविध विभागांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस्. यांनी केले आहे.
या पंधरवड्या दरम्यान प्रमुख उपक्रमांतर्गत अस्वच्छ ठिकाणांची निवड करून साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव, स्वच्छ सुजल गाव संकल्पनेशी निगडित प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत विशेष ग्रामसभांचे आयोजन करून हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव व स्वच्छ सुजल गाव घोषित करण्याचे उद्दिष्ट आहे.
25 सप्टेंबर रोजी एक दिवस - एक तास - एक सोबत या संकल्पनेतून देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या गावात सामूहिक श्रमदान करून स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. स्वच्छता ही सेवा 2025 मधील सर्व उपक्रम केंद्र शासनाच्या विशेष तयार केलेल्या IT पोर्टलवर (https://swachhatahiseva.gov.in/) अपलोड करण्याची सुविधा असल्यामुळे, जिल्ह्यात राबविण्यात येणा-या सर्व उपक्रमांचे याद्वारे शासन स्तरावरुन सनियत्रंण केल्या जाणार आहे.




