भुदरगड तालुका शिवसेना यांच्या वतीने क्रांतीज्योतीला अभिवादन

भुदरगड तालुका शिवसेना यांच्या वतीने क्रांतीज्योतीला अभिवादन

गारगोटी (प्रतिनिधी) - १३ डिसेंबर १९४२ रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गारगोटी कचेरीवर हल्ला करणाऱ्या 7 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या क्रांती ज्योतीला हुतात्मा स्मरण दिनानिमित्त भुदरगड तालुका शिवसेना यांच्या वतीने प्रा.अर्जुन आबिटकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी अभिवादन केले.

यामध्ये हुतात्मा नारायण वारके (कलनाकवाडी), हुतात्मा करवीराप्पा स्वामी (हुक्केरी), हुतात्मा शंकराव इंगळे (कापशी), हुतात्मा तुकाराम भारमल (मुरगुड), हुतात्मा मल्लाप्पा चौगुले (नानीबाई चिखली), हुतात्मा परशुराम साळुंखे (खडकलाट), हुतात्मा बळवंत जबडे (जन्नाट चिक्कोडी) या हुतात्म्यांचा सहभाग होता. 

13 डिसेंबर, 1942 रोजी ब्रिटीश राजवटीविरोधात लढताना गारगोटी, भुदरगड येथे 7 स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे बलिदान हे स्वातंत्र्याच्या लढ्याचे तेजस्वी स्मारक प्रत्येकाला प्रेरणा देणारं आहे. 

गारगोटी कचेरीवर हल्ला करून इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडावे, आणि कचेरीत अटक केलेल्या अन्य क्रांतीकाऱ्यांना मुक्त करून भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून द्यावे हा यामागचा हेतू होता. गारगोटी कचेरीवर अतिशय धाडसाने या शूरवीरांनी हल्ला केला. पण तत्कालीन इंग्रज सरकारच्या गोळीबारात हे सात वीर हुतात्मे झाले होते.

यावेळी गारगोटीचे उपसरपंच राहूल चौगले, ग्रा.पं.सदस्य सागर शिंदे, भरत शेटगे, संदीप देसाई, महेश सुतार, शिवसेना शहर प्रमुख रणधिर शिंदे, संदीप सोरटे, सचिन कांबळे, मनोज मुगडे यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.