शक्तीपीठ विरोधात १५ ऑगस्ट रोजी शेतकरीच शेतात फडकवणार तिरंगा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी तिरंगा झळकवू शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात या टॅगलाईनखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने शेतात तिरंगा फडकवत अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून याची सुरुवात सकाळी ९ वाजता आकुर्डे (ता. गारगोटी) येथील दौलत शिंदे यांच्या शेतात आंदोलन करुन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता एकोंडी (ता. कागल) लोंढे वसाहत येथील शिवाजी मगदूम यांच्या शेतात आणि त्यानंतर सकाळी ११ वाजता कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथील सुशीला गोपाळ पाटील यांच्या शेतात हे अभिनव आंदोलन करण्यात येईल.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्धवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, सम्राट मोरे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, आर के मोरे, शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके,शिवाजी मगदूम, राहुल बजरंग देसाई, बिद्री कारखान्याचे संचालक जीवन पाटील, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, सत्यजीत जाधव, शामराव देसाई, सचिन घोरपडे, बिद्रीचे संचालक एस. आर. कांबळे, एस बी पाटील आदी सहभागी होणार आहेत.