शिंदे गटाचे ‘हाय कमांड’ मुंबईत नसून दिल्लीत
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. शिंदे गटाचे ‘हाय कमांड’ मुंबईत नसून दिल्लीत असल्याचा आरोप राऊतांनी केला.मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे जरी ‘शिवसेना’ हे नाव वापरत असले तरी, त्यांच्या पक्षाची स्थापना प्रत्यक्षात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. अमित शाह हेच त्यांचे बॉस आहेत. ते दिल्लीत बसतात आणि शिंदे त्यांच्याकडून आदेश घेण्यासाठीच भेटायला जातात, असा टोला राऊत यांनी लगावला.

राऊत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, अजित पवार गट आणि शिंदे गट, या दोन्ही पक्षांचे खरे संस्थापक अमित शाहच आहेत. महाराष्ट्रात काय करायचे यासाठी त्यांचे नेते दिल्लीला जाऊन आदेश घेतात.राज्यसभा निवडणुकीतील निकालांवर बोलताना राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. क्रॉस व्होटिंग ही नेहमीच होत असते, पण आता ती पैशाच्या जोरावर होत आहे. भाजपने पैशाच्या आधारे मतं विकत घेतली. बिहार, ओडिशा आणि हरियाणामध्येही असे प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. अशा राजकारणामुळे देशाला फटका बसतो. मात्र, विरोधक एकत्र असून विविध राज्यांमध्ये एकजुटीने लढत असल्याचा दावा त्यांनी केला.
एलपीजी तुटवड्याच्या मुद्द्यावरही राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जनतेने सरकारवर विश्वास ठेवू नये. लोकांना अनेक किलोमीटरच्या रांगा लावाव्या लागत आहेत. मंदिरांमध्ये प्रसाद मिळत नाही, शाळा-कॉलेजच्या कॅन्टीन बंद आहेत. अशी परिस्थिती असूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.




