समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी) : वरिष्ठ पत्रकार समीर सुधाकर देशपांडे यांना सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

गुरूवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता पुणे येथील यशदा प्रशिक्षण संस्थेमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार श्रीकांत भारतीय, आणि पदमश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. देशपांडे हे गेली ३० वर्षे पत्रकारितेमध्ये असून त्यांनी ग्रामविकासाबाबत सातत्याने लेखन केले आहे. ग्रामविकास क्षेत्रातील अनेक राज्यस्तरीय बातम्यांचा परिणामही झाला असून त्याचे प्रतिबिंबही शासन निर्णयात उमटले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पत्रकारांसाठीच्या कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या अधिस्वीकृती विभागीय समितीचे ते अध्यक्ष असून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामही उभे केले आहे. ते मुळचे आजरा तालुक्यातील चिमणे येथील असून सध्या ते कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत.




