प्रसाद लाडांना धमकीच्या फोनवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मराठा समाजाला

प्रसाद लाडांना धमकीच्या फोनवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मराठा समाजाला

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते प्रसाद लाड आज अंतरवली येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना अंतरवलीत येण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, 30 मेपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या भेटीपूर्वी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये प्रसाद लाड थांबले असताना दोघांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. याआधी प्रसाद लाड यांच्या पीएला धमकीचा फोनही आला होता. या प्रकरणी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राजकारणात समाजकारणात अशा गोष्टी सुरू असतात. मराठा समाजाला गालबोट लागेल असे कोणीही वागू नये. आपल्या बांधवांनी अडीच पावणे तीन वर्ष शांततेने आंदोलन केलेले आहे. तुम्हाला या भूमिकेत जायची काही गरज नाही. ते काही बोलले देखील नाहीत. धमकी देणारे कोण आहेत हे मला माहित नाही. पण, हल्ल्याचे किंवा धमकीचे समर्थन होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, प्रसाद लाड हे मंत्री नाहीत. तरी पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही बोलावले नसते तर राज्यात त्यांनी संभ्रम पसरवला असता की, आम्ही येतो तरीही बोलावलं नाही. त्यांना राजकारणच करायचे आहे. त्यामुळे लाड साहेबांच्या खांद्यावर आता धुरा दिली आहे. जो माणूस चर्चा करून आलाय, त्याला मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?  श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांच्या मदतीला येत आहेत ते चूक आहे का? लाड यांच्या मनात बोलण्याची आत्मीयता आहे. त्यांचा आत्मविश्वास होता. 

लाड भाऊ देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आलेत. त्यांच्या माध्यमातून गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळेल. चर्चा सकारात्मक होईल, असं वाटतंय. ते 100 टक्के मुख्यमंत्र्यांकडून आमच्या मागण्या पूर्ण करतील ही अपेक्षा आहे. मला आणि लाड भाऊला समाजापेक्षा काय मोठे आहे? लाड भाऊंमुळे मला उपोषणाला बसायची वेळ येणार नाही, असे वाटते. लाड भाऊ यांच्यावर विश्वास ठेवला हे सत्य आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.