महात्मा गांधींसारखीच लोकांना एकत्र आणण्याची ताकद मोदींमध्ये; अरुण लखाणींचं मोठं विधान
मुंबई (प्रतिनिधी) : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात येत असतानाच आता महात्मा गांधी यांच्याशीही त्यांची तुलना करण्यात येत आहे. भाजप नेते, उद्योजक आणि विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले अरुण लखाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महात्मा गांधींशी करत एक विधान केल्यामुळे नव्या राजकीय चर्चांची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही असलेल्या अरूण लखाणी यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना गांधीजींप्रमाणेच लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरुण लखाणी म्हणाले, "महात्मा गांधी उपवासाचं आवाहन करायचे आणि संपूर्ण देश ते पाळायचा. तशी क्षमता आणि तसाच आदर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आहे. मोदींनी आवाहन केलं की लोक प्रतिसाद देतात. त्यांनी काटकसर करण्याचं आवाहन केलं आणि लोकांनी इंधनाचा वापर कमी करण्यास सुरुवात केली, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे."
यावेळी बोलताना त्यांनी आपल्या कुटुंबातील एका घटनेचा देखील उल्लेख केला. "मोदींच्या आवाहनानंतर आमच्या घरातूनही रेवती आणि सारंग यांच्या रिसेप्शनचा कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार २७ नोव्हेंबरला होणारा स्वागत समारंभ १६ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. पत्रिका छापून वाटल्या होत्या, त्यामुळे काही गोंधळ झाला. मात्र लग्न नियोजित वेळेतच होणार आहे," अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.




