सरकारनी आंदोलन हलक्यात घ्यायचं; मुख्यमंत्री आणि विखे पाटलांवर जरांगेंचा निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. वारंवार आम्ही आंदोलन करायची आणि सरकारने हलक्यात घ्यायचे, असे असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांना पुढचा काळ जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी बीडमधून दिलाय. सरकार वारंवार भुलवत राहणार असेल तर हे चालणार नाही. मराठा समाजाचा अवमान वारंवार होतोय. 2029 ला मराठा समाजाचा अवमान करणाऱ्याला पाडेल, असा देखील इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मराठा समाजाचे आरक्षण हक्काचे असताना दिले जात नाही. हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी आहेत, तरी देखील दिले जात नाही. तर राग येणारच. तुम्ही कुणाला भिऊन हे करता आहात? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.

आम्ही ओबीसीचे काढून आम्हाला द्या, असे म्हणत नाही. आम्ही आमच्या हक्काचे मागत आहोत. बीडच्या वडवणी तालुक्यात नोंदी सापडल्या. मात्र तेथील तहसीलदारांनी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी या नोंदी उडविल्या आहेत. नोंदी उडविण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील आक्रमक झाले. ओबीसी समाजाला आमचे म्हणणे कळत नाही. ओबीसी आणि मराठा समाजात दरी निर्माण का केली जाते, हे माहीत नाही. परंतु स्वतःला तज्ञ म्हणून घेणाऱ्यांना हे का कळत नाही? आम्ही ओबीसीतून मागत नाही. नोंदी असतील तर आरक्षण द्यायला हरकत काय? असा आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान अंतरवली सराटीहून परतताना अपघात झालेल्या मराठा सेवकाची बीड मधील रुग्णालयात आज मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.




