मुंबई कुटुंब मृत्यू प्रकरण: अर्धवट कलिंगडाबाबत FDAची महत्त्वाची माहिती
मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात गेल्या आठवड्यात एका कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या कुटुंबातील आई-वडील आणि दोन लहान मुलींनी 25 एप्रिलला रात्री दीड वाजता कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर पहाटेपासून त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. यानंतर उपचारादरम्यान या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. या सर्वांना कलिंगडातून विषबाधा झाली असावी, असा अंदाज त्यावेळी अनेकांनी व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाच्या घरातून अर्धवट उरलेल्या कलिंगडाचे नमुने घेतले होते. हे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अहवालानुसार डोकाडिया कुटुंबीयांच्या घरात आढळलेल्या कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी डोकाडिया कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. यात बिर्याणी, कलिंगड (टरबूज), माठातील व फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश होता.
कलिंगडात रंग, गोडवा तसेच त्याचा आकार वाढवण्यासाठी कोणताही कृत्रिम रंग अथवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा खुलासा FDA ने केला आहे. त्यामुळे कलिंगडातील भेसळीमुळे डोकाडिया कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याची शक्यता मावळली आहे. तसेच डोकाडिया कुटुंबाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इतर खाद्य नमुन्यांमध्ये अद्याप कोणतीही भेसळ आढळली नसल्याचेही FDA च्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता सर्व लक्ष डोकाडिया कुटुंबातील मृतांचा फॉरेन्सिक अहवाल आणि बॅक्टेरियल चाचण्यांकडे लागले आहे. कलिंगडात कोणतीही भेसळ न आढळल्याने आता डोकाडिया कुटुंबीयांच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले आहे.
डोकाडिया कुटुंबातील आई-वडील आणि लहान मुलींच्या मृतदेहांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्यानुसार, मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती समोर आली आहे. तज्ञांच्या मते सामान्य अन्न विषबाधेपेक्षा ही स्थिती वेगळी आहे. त्यामुळे विषबाधेची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. एकाचवेळी शरीरातील अनेक अवयवांमध्ये दिसून येतात, तेव्हा संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरात विष पसरलेले असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.




