अनुपम खेरचा टक्कल वक्तव्यावर पलटवार
मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. काल पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतांचे कल तृणमूल काँग्रेसच्या बाजूने नसून, बीजेपीच्या बाजूने दिसले. पहिल्यांदाच पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 207 जागांवर भाजपने घवघवीत विजय मिळवला. दरम्यान, गेली 15 वर्षे ज्यांनी सत्ता गाजवली, त्या तृणमूल काँग्रेस पक्षाला अवघ्या 80 जागांवर समाधान मानावे लागले. एकप्रकारे या पराभवामुळे ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाचा एक सुवर्ण अध्याय संपुष्टात आला, असं म्हणावं लागेल.

भाजपचा झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर पश्चिम बंगाल जणू भाजपमय झालं आहे. तृणमूल काँग्रेसची सत्ता पुन्हा पश्चिम बंगालमध्ये येणार नाही, असं ठामपणे भाजप पक्षातील काही नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अलिकडेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी, 'अनुपम खेर यांची केस उगवतील, पण तृणमूल काँग्रेसची सत्ता पुन्हा पश्चिम बंगालमध्ये येणार नाही', असं ठामपणे त्यांनी सांगितलं. आपल्या विधानातून त्यांनी अनुपम खेर यांचा उल्लेख केल्यामुळे, अभिनेत्याने व्हिडीओ ट्विट करत एक मजेशीर सवाल उपस्थित केला आहे.
'तृणमूल काँग्रेसची सत्ता जाणार होती. हे घडणारच होतं. जे घडणार आहे, ते आपण काय, कुणीच नाही टाळू शकतं. बघा आभाळ जमिनीवर येऊ शकतं. समुद्र आभाळावर जाऊ शकतो. अनुपम खेर यांच्या टक्कलवर पुन्हा केस येऊ शकतात. परंतु, तृणमूल काँग्रेसची सत्ता पुन्हा येणार नाही. हे स्वप्नांच्या पलिकडे आहे. जे होणार होतं, ते झालं. जे घडणार नाही, ती गोष्ट करणं आणि घडवून आणणं, ही ताकद कुणामध्ये नाही', असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.




