कोल्हापूर मनपाची विशेष मोहीम: १८० टन झाडांच्या फांद्यांचा उठाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक आणि विसर्जन मार्ग केले अडथळामुक्त, ८ जेसीबी, १६ डंपर आणि ६० कर्मचाऱ्यांचा ताफा मैदानात
कोल्हापूर/प्रतिनिधी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिरवणूक व विसर्जन मार्ग स्वच्छ, सुरक्षित आणि अडथळामुक्त ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने रविवारी (१३ सप्टेंबर) विशेष 'ट्री कटिंग उठाव मोहीम' राबवण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार शहरभर एकाच वेळी राबवलेल्या या मोहिमेत तब्बल १८० टन झाडांच्या फांद्या व कचऱ्याचा उठाव करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकांचा विचार करता महापालिका तसेच महावितरणतर्फे शहरातील रस्त्यांवर झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली होती. रस्त्याच्या कडेला पडून राहिलेले हे साहित्य वेळेत हटवण्यासाठी महापालिकेने विशेष नियोजन केले होते.
दोन स्वतंत्र पथके आणि मोठी यंत्रसामग्री:
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेने दोन स्वतंत्र टीम्स कार्यरत केल्या होत्या. या पथकांनी शहरातील मुख्य रस्ते, मिरवणूक आणि विसर्जन मार्गांची पाहणी करून रस्त्यावरील कचरा तातडीने हटवला. या कामासाठी ८ जेसीबी आणि १६ डंपर उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच महापालिकेचे २० आरोग्य निरीक्षक आणि ४० कर्मचारी अशा ६० जणांच्या ताफ्याने समन्वयाने ही कारवाई पूर्ण केली.
गणेशोत्सवात विसर्जन मार्गावर वाहतुकीस अडथळा येऊ नये, नागरिकांची सुरक्षितता राहावी आणि रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन सेवा सुरळीत सुरू राहाव्यात, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले.




