भारतीय जनता पक्षाचा ४६ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): जनसंघापासून राजकीय, सामाजिक वाटचाल केलेल्या भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० मध्ये झाली. आज या पक्षाचा ४६ वा वर्धापनदिन... या निमित्तानं आज पक्षाच्यावतीनं सक्रिय कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत भारत माता प्रतिमा पूजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संसदेत प्रारंभी २ खासदारांच्या संख्याबळामुळं टिकेचा धनी बनलेला भारतीय जनता पक्ष आता महाराष्ट्रासह २१ राज्यात सत्तास्थानी आहे. यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. हा उत्साह आजच्या ४६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात दिसून आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वर्धापनदिन पक्ष कार्यालयात पार पडला. प्रारंभी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सर्वांचे स्वागत करून पक्षाच्या आगामी संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये सर्वांनी भाग घेण्याचे आवाहन केले.
यानंतर पक्षाच्या वाटचालीत योगदान दिलेल्या राजाराम शिपुगडे, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, किशोरी स्वामी, प्रभावती इनामदार, ऍड. संपतराव पवार, भारती जोशी, प्रमोदिनी हर्डीकर, अशोक लोहार, ईश्वरा पाटील, सुलभा मुजुमदार, राजाराम परिट यांचा सत्कार नामदार पाटील आणि खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी, पक्षाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. सन २०४७ पर्यंत भारताला जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनवण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. त्यांचा हा निर्धार यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच पक्ष कार्याला वाहून घ्यावं. देशात २०२९ पर्यंत आता कोणत्याही निवडणूका नाहीत. त्यामुळं भविष्यातील निवडणूका जिंकणं महत्वाचं आहे. त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करणे, पक्ष संघटन बळकट करून, केंद्र आणि राज्यांच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचवा, असं आवाहन केलं.
सन २०२७ पासून देशातील लोकसभा - विधानसभा मतदार संघांची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर होणार्या निवडणूकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. या संबंधीच्या विधेयकावर संसदेत १६ एप्रिल पासून चर्चा सुरू होणार असल्यानं, महिलांना याही निवडणूकांत अच्छे दिन येतील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, नाथाजी पाटील, शौमिका महाडिक, महापौर रूपाराणी निकम, राहुल चिकोडे, विशाल शिराळे, मुरलीधर जाधव, तानाजी पाटील, विराज चिखलीकर यांच्यासह भाजपा नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




