६ फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची मान्यता; "सर्वोच्च न्यायालय गुलाम..." म्हणत संजय राऊतांचा संताप
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिल्लीतून मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ खासदारांच्या गटाला लोकसभा सचिवालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हे ६ खासदार आता कायदेशीररित्या शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले आहेत. या घडामोडीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक होत केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर तोफ डागताना संजय राऊत म्हणाले की, "देशात संविधान आणि लोकशाही कुठे उरली आहे? सर्वोच्च न्यायालयही गुलाम झाले आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने आमच्या ४० आमदारांच्या प्रलंबित प्रकरणाचा निकाल वेळीच दिला असता, तर देशात वारंवार पक्ष फोडण्याची हिंमत कोणाची झाली नसती. दहाव्या परिशिष्टानुसार कोणत्याही पक्षफुटीला किंवा विलीनीकरणाला कायदेशीर मान्यता नाही, असे असताना लोकसभा अध्यक्षांनी या फुटीर गटाला मान्यता कशी दिली?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधताना राऊत पुढे म्हणाले, "दाढी असली म्हणजे कोणी आचार्य विनोबा भावे होत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे जे बोलतात ते अंतिम सत्य किंवा नीतिमत्तेचे आहे असे समजण्याची गरज नाही. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या या ६ लोकांना ५० कोटींना विकत घेण्यात आले आहे. हे लोक निर्लज्ज आणि गद्दार आहेत. आम्ही त्यांना कष्ट करून निवडून आणले आहे. जनतेने मतदान माननीय उद्धव ठाकरे आणि मशाल चिन्हासाठी केले होते, तुमच्या चोरलेल्या धनुष्यबाणासाठी नाही."
संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत टीका करत म्हटले की, "दाढीवर हात फिरवून आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची नीतिमत्ता अमित शाह यांच्या चरणी गहाण पडली आहे. लोकसभा अध्यक्ष आणि संसद स्तरावर जे काही घडत आहे, तो लोकशाहीचा खून आहे. अशा प्रकारे पक्ष फोडणारे लोक लोकशाहीचे गुन्हेगार आहेत. एकीकडे सर्वसामान्यांना अन्न, पाणी मिळत नाही, शिक्षणासाठी तरुण उपोषणाला बसत आहेत आणि दुसरीकडे हे ५० कोटींना माणसे विकत घेत आहेत," अशा कडक शब्दांत त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.




