जरांगे प्रकरणावरून नवा वाद; लक्ष्मण हाकेंचा फडणवीस सरकारवर थेट हल्ला,न्यायालयात जाण्याचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकारनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता इतर मागासवर्गीय समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा लागू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. याशिवाय, मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णयही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले की, काल राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत, त्यावरच बरीच चर्चा सुरू आहे. ज्या योजना ओबीसींसाठी, त्याच योजना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय झाला आहे. ज्या योजना ओबीसी समाजाला दिल्या आहेत, त्या अभ्यासपूर्ण आहेत. याच योजना मराठा समाजासाठी जाहीर करत आहेत, त्यामागचे लॉजिक आम्हाला कळले नाही. मराठा समाज त्या नियमांत बसतो का? ही तर शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे, अशी टीका त्यांनी केलीय.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, सर्व निकष बाजूला ठेवले आहेत का? अनेक महामंडळांना अपुरा निधी असताना, मराठा समाजाला एवढा निधी का दिला जात आहे? ओबीसी लोकांना सरकारने आतापर्यंत काय दिले आहे, त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक प्रश्न सरकारवर उपस्थित होत आहेत. मागासवर्गीय लोकांना माणुसकी म्हणून पुढे येण्यासाठी सरकार काही योजना देणार आहे का? सरकार मूलभूत तत्त्वांना हरताळ फासत आहे. कालचा निर्णय असंवैधानिक आहे.
मराठा समाजाला ओबीसींच्या योजना दिल्या, मग राज्यात आता राहिले कोण आहे? मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना काही वेगळे मिळत असेल तर आमचा विरोध नाही, मात्र हे देताना काय निकष लावले आहेत? कुठल्या तत्त्वावर तुम्ही हे दिले, कुठल्या समितीची शिफारस यासाठी होती? हे सरकार झुंडशाहीला बळी पडले आहे, हे सरकार मनोज जरांगे समोर लाचार झाले आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.




