'रामायण'ला ऑस्कर मिळायलाच हवं; मुख्यमंत्र्यांकडून सिनेमाचं तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

'रामायण'ला ऑस्कर मिळायलाच हवं; मुख्यमंत्र्यांकडून सिनेमाचं तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर 'रामायण' सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर सिनेमातील भव्यता, VFX आणि दमदार स्टारकास्टचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 'रामायण' सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. "या सिनेमाला ऑस्कर मिळालं नाही, तर ऑस्करच्या ज्युरीबद्दल मला निराशा वाटेल," असं वक्तव्य त्यांनी केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोरेगाव येथील फिल्मसिटीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसेच 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही करण्यात आलं. याच कार्यक्रमात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज प्राईम फोकस स्टुडिओचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्राईम फोकसचे नीरज माझ्याकडे आले होते, तेव्हा त्यांना अनेक अडचणी होत्या. मुंबईत मोठी यंत्रणा उभी करायची होती. आम्ही पुढाकार घेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. 2025 मध्ये एमओयू झाला आणि कमी वेळेत ही सुविधा उभी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. कागदावर योजना मांडणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात ती उभी करणं कठीण असतं. त्यांनी फेज-1 यशस्वीपणे पूर्ण केला आहे. प्राईम फोकसचं हे कार्यालय म्हणजे क्रिएटिव्हिटीचं जागतिक दर्जाचं केंद्र आहे."

ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरेंज इकॉनॉमीची संकल्पना मांडली आणि त्यादृष्टीने आपण काम करत आहोत. आपल्या संस्कृतीतील कथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचं काम सुरू आहे. इतिहास सांगेल की 'रामायण'सारखा भव्य सिनेमा याच ठिकाणी तयार झाला."

'रामायण' सिनेमाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "'रामायण'ला ऑस्कर मिळालं नाही, तर ऑस्करच्या ज्युरीबद्दल मला निराशा वाटेल. या सिनेमाची आम्हालाही मोठी उत्सुकता आहे. अशा प्रकारचं इकोसिस्टम तयार होत असल्याचा आनंद आहे. यामुळे युवा वर्गासाठी आणि क्रिएटिव्ह क्षेत्रासाठी मोठ्या संधी निर्माण होतील. महाराष्ट्रात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत."

ते पुढे म्हणाले, "3 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पातून वर्ल्डक्लास व्हिज्युअल आणि अत्याधुनिक सुविधा उभारण्याचा निर्णय झाला होता. आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे. हे आता जागतिक दर्जाचं सेंटर बनलं आहे. जगातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. आपण सर्वजण ज्या 'रामायण' सिनेमाची वाट पाहत आहोत, त्याचं बहुतांश काम याच स्टुडिओमध्ये झालं आहे."

यावेळी त्यांनी मनोरंजन क्षेत्राबाबतही भाष्य केलं. "महाराष्ट्रात जीएसटी लागू झाल्यानंतर मनोरंजन कर रद्द करण्यात आला. त्यामुळे राज्यात प्रदर्शित होणारे सर्व चित्रपट मनोरंजन करमुक्त आहेत," असं त्यांनी सांगितलं.

मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "जशी दुसरी मुंबई तयार होऊ शकत नाही, तसंच मुंबईबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात फिल्म इकोसिस्टम उभी राहू शकत नाही. मुंबई ही नैसर्गिकरित्या विकसित झालेली फिल्म इंडस्ट्री आहे. इतर राज्यांनीही प्रयत्न करावेत, त्यात आम्हाला आनंदच आहे. मात्र मुंबईचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही."

शेवटी ते म्हणाले, "आज उद्घाटन झालेला हा देशातील सर्वात आधुनिक स्टुडिओ आहे. यासोबतच आणखी अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याचं आणि संपूर्ण फिल्मसिटीच्या पुनर्विकासाचं नियोजन सुरू आहे. जगातील सर्वात प्रगत फिल्ममेकिंग इकोसिस्टम महाराष्ट्रात उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."