सस्टेनॅब्लिटीसाठी रिस्क ही घेतलीच पाहिजे - डॉ. शर्मिली माने
कोल्हापूर (प्रतिनिधी) - श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये "नवसंवाद २०२५ सन्मान नारी शक्तीचा जागर विचारांचा" या नवरात्रीनिमित्त आयोजित अनोख्या व्याख्यानमालेचे २ रे पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक प्रा. डॉ. एस. आर. चौगुले होत्या. "उद्योजकता विकासातील महिलांचे योगदान" या विषयावर प्युअरमी ऑरगॅनिक्सच्या संस्थापक, सीईओ, उद्योजिका डॉ. शर्मिली माने बोलताना म्हणाल्या, "एखादा स्टार्टअप सुरू करताना पुढील आणि मागील दोन्ही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. चुकांमधून शिकत जावा. तुमच्यातील शक्ती ओळखा. आत्मपरीक्षण करा. सस्टेनॅब्लिटीसाठी रिस्क ही घेतलीच पाहिजे. छोट्या गोष्टीतूनच मोठ्या संधी निर्माण होत असतात, त्या शोधणे गरजेचे आहे. व्यवसायात निवडल्यानंतर हार मानू नका."

यानंतर "महिलांचे आरोग्य आणि सुरक्षितता" याविषयी स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना ३ रे पुष्प गुंफले. आयुर्वेद दिवसानिमित्त व्याख्यान देताना डॉ. अनुजा कुलकर्णी म्हणाल्या, "आजच्या धावपळीच्या युगात विविध आघाड्यांवर काम करताना महिलांनी सकस व पौष्टिक आहाराद्वारे आपले आरोग्य सांभाळले पाहिजे. शुद्ध विचार, आचार आणि आहारच आपले जीवन समृध्द करेल."
यावेळी डीन स्टुडंट अफेयर्स डॉ. जे. एम. शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. दिग्विजय पवार, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख डॉ. विशाल वाडकर, एआय अँड एमएल विभागप्रमुख डॉ. एस. एस. सरडे, समन्वयक प्रा. रोहिणी वडेर, प्रा. सानिका बावचकर यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




