पुणे विषारी दारू प्रकरण : विक्री झालेला दारू अड्डा 24 तासांत जमीनदोस्त होणार

पुणे विषारी दारू प्रकरण : विक्री झालेला दारू अड्डा 24 तासांत जमीनदोस्त होणार

पुणे (प्रतिनिधी) : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारु प्रकरणामुळे नागरिकांचा संताप आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडून केला जात आहे. दरम्यान, याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत जिथून विषारी दारुची विक्री झाली, तो दारू अड्डा महापालिका नेस्तनाबूत करणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या पडताळणीत हा दारु अड्डा अनधिकृत असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळं पुढच्या 24 तासांत हा दारु अड्डा हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे. स्वतःहून न हटवल्यास पालिका हा अड्डा नेस्तनाबूत करणार आहे.

विषारी दारुकांडात सीआयडीने मोठी कारवाई केलीये. योगेश व्हानखेडेला मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्यात. रेक्स इंटरनॅशनल कंपनीत हे दोघे कामाला होते. कंपनीला अंधारात ठेऊन या दोघांनी मिथेनॉलची विक्री केल्याचं तपासात निष्पन्न झालं. बनावट जीएसटी नंबर आणि प्रदीप शर्माच्या नावाचे बनावट आधार कार्ड घेऊन, 17 हजार 500 रुपयांचे 210 लिटर मिथेनॉल दिलं होतं. हेचं मिथेनॉल दारुत मिक्स केल्यानं 25 जणांचा जीव गेलाय. त्यामुळं योगेशकडे हे मिथेनॉल कुठून आले, याचा शोध सीआयडीने घेतला. त्या अनुषंगाने ठाण्यातील नारपोली येथून या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

पुण्यात समोर आलेल्या या विषारी दारु प्रकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तब्बल 18 जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. यामुळे 18 संसार हे उघड्यावर पडले आहेत. आरोपींनी या दारुत असं नेमकं काय मिळवलं होतं? याचा तपास आता केला जात असेल. असं असलं तरी अशाप्रकारच्या दारुची विक्री होत असताना पोलिसांना याबाबत काहीच कशी माहिती मिळत नाही? असा देखील प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सर्रासपणे अशाप्रकारची दारु विक्री कशी होते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याशिवाय दारु ही आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे शक्यतो दारु ही टाळली पाहिजे, अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये होताना दिसत आहे. पुण्यातल्या या प्रकरणात आता कोण-कोण पकडलं जातं आणि काय शिक्षा होते? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. फुगेवाडी आणि हडपसर परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या 18 जणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ आणि संतापाचे वातावरण आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोन भावांचाही मृत्यू झाला असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.