सरसंघचालक मोहन भागवतांसोबत धुरंधर रणवीर सिंहची रेशीम बागेत गुप्तभेट
मुंबई (प्रतिनिधी) : धुरंधर' आणि 'धुरंधर 2' चित्रपटामुळे अभिनेता रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) करिअरचा आलेख झपाट्याने वर गेला. रणवीर सिंहने साकारलेली जसकिरतची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. यातून जसकिरतचं भारत देशाप्रति असलेलं प्रेम दाखवण्यात आलं आहे. रणवीरची देशभक्ती पाहून संपूर्ण भारताने या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला. दरम्यान, रणवीर सिंह सध्या गुप्तपणे पार पडलेल्या नागपूर दौऱ्यामुळे चर्चेत आहे. माहितीनुसार, रणवीरने नागपूरच्या रेशीबाग येथील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (RSS) डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. दरम्यान, रणवीर सिंहच्या नागपूर दौऱ्याची माहिती समोर आल्यानं, सामाजिक तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.नागपूर दौऱ्यात नेमकं काय घडलं? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रणवीर सिहं हा नागपूर दौऱ्यावर होता. अभिनेता रेशीमबाग परिसरातील स्मृती मंदिरात अचानक दाखल झाला. यावेळी त्याने संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या समाधीजवळ जाऊन आदरांजली वाहिली. तसेच दुसरे सरसंघचालक डॉ. गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाजवळही जाऊन आदरांजली वाहिली. विशेष म्हणजे हा संपूर्ण दौरा गुप्त ठेवण्यात आला होता. रणवीरच्या या गुप्त दौऱ्याची माहिती समोर येताच, अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यानंतर रणवीरनं संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी मोहन भागवत आणि रणवीर सिंह यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. भेटीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. दरम्यान, ही भेट सौजन्यपूर्ण असल्याची माहिती संघाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यावेळी रणवीरने संघातील काही पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली.
या अचानक भेटीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भेट झाल्यानंतर रणवीरने थेट नागपूर विमानतळ गाठले. माहितीनुसार, रणवीर रात्री सव्वा आठच्या सुमारास मुंबईच्या दिशेनं रवाना झाला.रणवीर सिंहचा हा दौरा आणि संघ मुख्यालयातील भेट गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे भेटीमागचं कारण काय? ही भेट गुप्त ठेवण्यामागचं कारण काय? असे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.




