राष्ट्रवादीचे 40 जण भाजपात जाणार; अतुल लोंढेंचा गौप्यस्फोट
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) सध्या काही आलेबल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे सरचिटणीस राहिलेल्या आनंद परांजपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दुसरीकडे राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याची देखील चर्चा सुरू आहे. त्यातच, पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ही चर्चा आणखी गडद झाली असून आमदार रोहित पवारांनीही भाष्य केलं. राष्ट्रवादीतील 24 आमदार भाजपात जातील, असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला होता. त्यावर, आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही खो दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं कोण चालवत आहे. शरद पवार, भाजपा, सुनील तटकरे की प्रफुल पटेल? नेमक कोण चालवत आहे, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला. तसेच, रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीतील 40 लोकांची नावे आहेत, जे भाजपमध्ये जाणार आहेत, असेही त्यांनी म्हटले. रोहित पवार यांच्या मताशी मी सहमत आहे, जेपी नड्डा यांनी म्हणलं होतं विरोधी पक्ष राहणार नाही. त्यातच, सातत्याने अशा बातम्या येत आहे, सत्तेत गेल्यावर हे फुटणार आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार असल्याचा गौप्यस्फोट अतुल लोंढे यांनी केलाय.
अतुल लोंढेंना शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेतील उपस्थितीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती किती वेळा आहे? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच, त्यांची उपस्थिती अतिशय कमी आहे, ते टिंगल टवाळी करायला संसदेत येत आहेत. उध्दव ठाकरे यांची त्यांच्यापेक्षा जास्त आहे. पण, त्यांची उपस्थिती कमी होती हे खरं आहे, असेह लोंढे यांनी म्हटले. दरम्यान, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना, सदाभाऊ स्वतः घुबड आहेत, अशा शब्दात अतुल लोंढेंनी सदाभाऊंवर टीका केली.




