गोकूळच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठेपणा व समंजसपणा दाखवावा- बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर

गोकूळच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठेपणा व समंजसपणा दाखवावा- बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्ष हा देशासह राज्यामध्ये सर्वात मोठा भाऊ आहे, हे आम्ही सर्वांनीच मान्य केलेले आहे आणि कबूल केलेले आहे. त्याप्रमाणे युती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चालू आहे. गोकूळच्या निवडणुकीमध्ये कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत भारतीय जनता पक्षावर आम्ही कधी टीका केली नाही. आम्ही आकडेवारी देतानासुद्धा भारतीय जनता पक्षाचे किती ठरावधारक आहेत, हे कधीही आम्ही जाहीर केलेले नाही.परंतु, भारतीय जनता पक्षाने शक्ती प्रदर्शनाने ठराव देताना महासैनिक दरबार हॉलमध्ये जी सभा झाली, त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक आणि आमदार शिवाजीराव पाटील यांनी जी मनोगते व्यक्त केली आहेत, ती विनाकारण युतीमध्ये मतभेद निर्माण करणारी आहेत. यापुढच्या काळात त्यांनी सबुरीने घ्यावे, समंजसपणा आणि मोठेपणा दाखवावा असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी सांगितले.

ते म्हणाले खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या आकडेवारीवर काही प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत.

त्यामध्ये-

 १- आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे असताना ते राष्ट्रवादीचे कसे आणि त्यांची १५० मते त्यांनी धरलेली आहेत? अनेक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राजेंद्र पाटील- यड्रावकर हे अपक्ष म्हणून शिरोळ तालुक्यामध्ये काम करत आहेत आणि त्यांनी शिंदे गटाला आज पाठिंबा दिलेला आहे. परंतु; विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक, नगरपालिका निवडणूक, यापूर्वी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका, गोकूळ आणि इतर सर्व निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका ही आमचे नेते नामदार हसन मुश्रीफांचे नेतृत्व मान्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने राहिलेली आहे. कालच आमदार  राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर  यांनी "आम्ही शिवसेना शिंदे गटातच आहोत, सहकारामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकूळमध्ये मंत्री हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम करणार", अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. आता आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला काय आणि शिवसेनेला दिला काय, म्हणजे ते युतीतच आहेत. त्यामुळे ही चर्चा इथे सांगून विनाकारण गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही.

 २- कुपेकरांचीही मते यामध्ये आहेत, असे त्यांनी सांगितले. स्वतः नंदाताई बाभूळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन 'आम्ही जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढविल्या आहेत. आम्ही गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातील सगळे राष्ट्रवादीचे गोकूळचे ठरावधारक मंत्री हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम करतील' अशी भूमिका जाहीर केलेली आहे.

 ३- शेकाप पक्षाचे काही ठराव हे राष्ट्रवादीत आलेले आहेत, असाही त्यांनी उल्लेख केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि  झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेकाप पक्ष म्हणजेच माजी आमदार संपतराव पवार-पाटील आणि कै. पी. एन. पाटील यांच्या दोन गटांतील अनेक वर्षांचे राजकीय मतभेद संपवून ते एकत्र आले. परवाच  संपतबापूंचे पुत्र क्रांतीकुमार पाटील यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्याने ते विजयी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेच त्यांनी आपले ठराव दिलेले आहेत.

□ हा फटका महायुतीलाच.....!

आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो अवसायनामधील ठराव. हे जे अवसायनातील ठराव आहेत, ते जनसुराज्य, शिवसेना- शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे असे मिळून २०० ते २५० ठराव तिघांचे आहेत. त्यामुळे, वास्तविक हा खरा फटका हा युतीलाच बसतोय. हे तर महायुतीच्या  खऱ्या कार्यकर्त्यांचे ठराव आहेत, हे पॅनल टू पॅनल मतदान करणारे ठराव आहेत. ते घालवण्यासाठी भारतीय जनता पक्ष का अट्टाहास करतोय? त्याचे कोडे आम्हाला कधीच उलगडलेले नाही. कारण; निवडणुकीमध्ये याचा जास्त फायदा विरोधी महाविकास आघाडीला होणार आहे. आम्ही याची जाणीव अनेकदा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला करून दिलेली आहे. याचा निवडणुकीत जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे, हे आम्ही त्यांना सांगितले आहे.

 □ आमची आकडेवारी वस्तुनिष्ठ......!

आम्ही जी आकडेवारी जाहीर केलेली आहे, ती तंतोतंत वस्तुस्थितीला धरून केलेली आहे. त्यामध्ये शुक्रवार २६ या तारखेला जे आम्ही निवेदन केलेले होते की, प्रत्यक्ष परस्पर आलेले ठराव ६१८, आम्ही शक्ती प्रदर्शनाने गुरुवारी  २५ रोजी १७४३ ठराव दाखल केले.  सोमवारी २९ पुन्हा १०१ ठराव दाखल केले. बुधवार १ जुलै रोजी अखेरच्या मुदतीपर्यंत उर्वरित ठराव झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी आकडेवारी जाहीर करणार आहोत. तसेच;  पक्क्या यादीनंतर आमची संख्या किती आहे हे कळण्यासाठी  सगळ्यांना बोलावून याची फोटोग्राफी करून प्रसारमाध्यमांमध्ये टाकणार आहोत. हे जे आम्ही काम करतोय ते अशासाठी की, हा प्रश्न उमेदवारी देताना उद्भवणार होता, म्हणूनच आम्ही पहिल्यांदा ठराव देण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही वस्तुस्थिती जिल्ह्यासमोर मांडली आहे. माझी खासदार साहेबांना विनंती आहे की, आम्ही जशी आकडेवारी जाहीर केली तशी आपणही करावी. खरतर आम्ही ही काय मागणी करणार नव्हतो, परंतु तुम्ही आता आमच्यावर संशय व्यक्त केला असल्यामुळे आता हेही निराकरण होण्याची आवश्यकता आहे.

□ दुसरे म्हणजे, तुम्ही बोलण्याच्या भरात एक एक्का आमच्याकडे आलेला आहे आणि तीन एक्के राहिलेले आहेत, असे म्हटले. ज्या तालुक्यातून तुम्ही एक्का घेतला, त्याच युतीतले एक्के नाराज होणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्यायला हवी होती. आतासुद्धा अनेक जे ठरावधारक मोठे आहेत, तेसुद्धा आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. परंतु; आम्ही तेथील नेतृत्वाला विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय घेणार नाही. मला वाटतय ही निवडणूक युतीधर्म म्हणून लढवायची असेल तर आपल्याला हे सगळे संयमाने घ्यावे लागेल आणि जबाबदारीने वागावे लागेल. निवडणुकीमध्ये एकदिलाने काम करावे लागेल. नाहीतर; विनाकारण आपण सगळे बदनाम होऊ. असे कृत्य कोणी करायला नको.

 □ विभागीय सहकार उपनिबंधकांनी ४२७ संस्थांच्या सभासदत्वाचा रद्द करण्याचा काढलेल्या आदेशाचे गंभीर परिणाम या निवडणुकीवर होतील, असे मला वाटते.  यासंदर्भात मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून झालेली कारवाई परत घ्यावी, अशी विनंती करावी लागेल. नाहीतर; नाईलाजास्तव  आम्हाला न्यायालयाचा मार्ग धरावा लागेल. न्यायालयीन लढाई होत राहील. मतदानाच्या आधीच्या दिवसापर्यंत न्यायालयीन लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी असते. परंतु,  दुर्दैवाने हे सगळं आमच्या वाट्याला यायला नको होतं, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना- शिंदे गट, जनसुराज्य अशा आम्हा  तिन्ही मित्रपक्षांची भावना होती.