इंडिया आघाडीच्या दिल्ली बैठकीत 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब; पुढील रणनीती ठरली

इंडिया आघाडीच्या दिल्ली बैठकीत 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब; पुढील रणनीती ठरली

दिल्ली (प्रतिनिधी) : इंडिया आघाडीच्या बैठकीत देशभरातून एकूण 25 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. त्यामध्ये, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख पक्षांचा सहभाग होता. त्यामध्ये, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची दिल्लीतील बैठकीला उपस्थिती होती, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाईन हजर होते. नुकतेच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक असल्याने प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या उपस्थितीतकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची गळाभेट लक्षवेधी ठरली. 

इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती झाली, या मुद्द्यांवर आघाडी काम करणार असून लढणार आणि पुढे जाणार असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष तथा इंडिया आघाडीचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. त्यामध्ये, एसआयआर, नीट पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, देशाची आर्थिक स्थितीसंदर्भाने प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच, पुढील बैठक हैदराबाद येथे होणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं. विशेष म्हणजे कॉकरोच जनता पार्टीने पहिल्या आंदोलनात उचलून धरलेला मुद्दाही इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रकर्षणाने जाणवला. त्यानुसार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या या बैठकीवर सत्ताधारी भाजप महायुतीच्या नेत्यांकडून टीका होत आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दिल्लीतच असल्याने त्यांनी तेथून इंडिया आघाडी आणि काँग्रेस नेत्यांवर टीका केलीय. तर, उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.   

1. लवकरच सरन्यायाधीश यांना SIR वर पत्र लिहिणार

2. धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे

3. आर्थिक स्थिती, बेरोजगारी आणि शेतकरी मुद्द्यांवर केंद्र सरकारने तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी 

4. प्रत्येक दोन महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार, पुढील बैठक हैदराबाद येथे होणार

5. पावसाळी अधिवेशनात इंडिया आघाडीतील पक्षाचे समन्वय साधला जाणार, दररोज विरोधी पक्षाच्या कक्षात बैठक होणार

यासह लोकांच्या हिताच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगण्या आले. दरम्यान, आजच्या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि झारखंडमधून हेमंत सोरेन ऑनलाईन सहभागी झाले होते, त्यांनी देखील या मुद्दयांना आपली सहमती दर्शवली आहे.