कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध , शहराची हद्दवाढ होणं फार गरजेचं ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोल्हापूर: "कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून शहराला निधीची कोणतीही कमी पडू दिली जाणार नाही. मात्र, शहराचा सुसज्ज व सुनियोजित विकास करायचा असेल, तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ करणे अत्यंत गरजेचे आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कोल्हापुरात आयोजित केलेल्या विविध विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री माधुरी मिसाळ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खा. शाहू महाराज छत्रपती, खा. धनंजय महाडिक आणि महायुतीचे आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमधील विविध विकासकामांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "रंकाळा तलावात कारंज्यांचे उद्घाटन करण्यात आले असून शहरात ४८४ कोटी रुपयांच्या विविध पायाभूत नागरी सुविधांची कामे सुरू आहेत. यामध्ये भुयारी गटार योजना आणि १७ किमी नाल्यांची संरक्षण भिंत उभारण्याच्या कामांचा समावेश आहे."
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, "कोल्हापूर खंडपीठासाठी शेंडा पार्क येथे ७५ एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खंडपीठामुळे शहरात रोज हजारो लोकांची ये-जा वाढेल, त्यामुळे शहराचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे. याशिवाय आयटी पार्क आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारणीची कामेही वेगाने सुरू आहेत. हद्दवाढीच्या प्रक्रियेत हद्दीबाहेरील नागरिकांच्या ज्या अडचणी असतील, त्या १०० टक्के सोडवण्याची जबाबदारी आमची असेल."
"कोल्हापूरकरांनी नेहमीच भरभरून आशीर्वाद दिला आहे. यापूर्वीही कोल्हापूरच्या विकासात आम्ही कधी कमी पडू दिले नाही आणि पुढेही पडू देणार नाही," असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.




