हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? पराभवानंतर अवघ्या 10 दिवसांत वकिली पोशाखात थेट हायकोर्टात
कोलकत्ता (वृत्तसंथा) : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, राज्यातील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणीसाठी गुरुवारी वकिली पोशाखात कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल झाल्या. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यभरात हिंसाचाराच्या घटना घडल्या. टीएमसी नेते कल्याण बॅनर्जी यांचे पुत्र शिरशमान्य बॅनर्जी यांनी या संदर्भात कलकत्ता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत शिरशमान्य यांनी अनेक भागांमध्ये पक्षाच्या कार्यालयांवर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याचा आणि त्यांना विस्थापित केल्याचा आरोप केला आहे.

हे प्रकरण मूख्य न्यायमूर्ती एच. सी. सुजॉय पॉल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आले होते. या विषयावर आपली बाजू मांडण्यासाठी ममता बॅनर्जी न्यायालयात हजर झाल्या. या संदर्भात, टीएमसीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली. ज्यामध्ये ममता बॅनर्जी वकिलाच्या वेशात दिसत आहेत. टीएमसीने ममता बॅनर्जींच्या न्यायालयीन भेटीचा एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे, "भाजप बंगालने बंगालभर केलेल्या निवडणुकीनंतरच्या व्यापक हिंसाचारासंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी आमच्या राष्ट्रपती ममता बॅनर्जी आज स्वतः कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचल्या."
या पोस्टमध्ये टीएमसीने पुढे लिहिले आहे, "त्यांचे वेगळेपण काय आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्या बंगालच्या लोकांना त्यांच्या गरजेच्या वेळी कधीही सोडून देत नाहीत. त्या सत्य, न्याय आणि घटनात्मक मूल्यांसाठी लढणे कधीही थांबवत नाहीत. आणि वेळोवेळी, त्या करुणा, धैर्य आणि दृढ विश्वासाने द्वेषाच्या राजकारणाच्या वर उठतात. एसआयआरच्या अन्यायाला तोंड देणे असो किंवा भाजप अनियंत्रित वर्तनाविरोधात ठामपणे उभे राहणे असो, त्या सातत्याने हे सिद्ध करतात की आज देशात त्यांच्यासारखा नेता नाही."
नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 207 जागा मिळवून पहिल्यांदाच दोन-तृतीयांश बहुमत मिळवले, तर बंगालमध्ये 15 वर्षे सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. टीएमसीला 80 जागांवर समाधान मानावे लागले आणि ममता बॅनर्जी स्वतः भवानीपूरमधून आपली जागा गमावून बसल्या.




