कोकणात पावसाचे तांडव; कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, ताम्हिणी मार्गही बंद

कोकणात पावसाचे तांडव; कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, ताम्हिणी मार्गही बंद

मुंबई: कोकणात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतूक  वस्थेला मोठा फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड-पोलादपूर दरम्यान असलेल्या कशेडी घाटात आज (६ जुलै) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक दरड कोसळली. नव्या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कशेडी घाटातील वाहतूक आता महाड-विन्हेरी मार्गावरून वळवण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, खेड पोलीस, महसूल विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या जेसीबीच्या साहाय्याने रस्ता साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक रोखण्यात आली असून, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ताम्हिणी घाटही वाहतुकीसाठी ठप्प दुसरीकडे, रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या माणगावजवळील ताम्हिणी घाटातही दोन ठिकाणी दरड कोसळल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे. पुणे हद्दीत रस्ता खचला असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तैनात आहेत.

सुकेळी खिंडीत पाणीच पाणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुकेळी खिंडीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, "पाण्याचा निचरा होईपर्यंत नागरिकांनी या महामार्गावरून प्रवास करणे टाळावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गाचा वापर करू नये," असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.