महिला अत्याचारांवरुन उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल

महिला अत्याचारांवरुन उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई (प्रतिनिधी) : मागच्या कार्यक्रमाला मी इथं आलो होतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली, 58 वर्ष नेतृत्व करणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. जी परिस्थिती आपण पाहोत आहोत, आपण यावर काय बोलायच? बोलून काही होणार आहे का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी  सरकारवर हल्लाबोल केला. भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य आणि देशातील राजकीय परिस्थिती, कामगार क्षेत्रातील मक्तेदारी आणि केंद्रातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच, राज्यातील महिला अत्याचारांवरुन फडणवीसांवरही जोरदार टीका केली.

आपण जी दिशा पकडली आहे, त्यावरुन पुढील वाटचाल होणार आहे हाच आपल्या वार्षिक सभेचा हेतू आहे. दत्ताजी यांचं नाव घ्यायलाच पाहिजे. सन 1966 साली शिवसेना स्थापन झाली आणि दरवाज्याची बेल वाजली आणि दत्ता साळवी आले आणि म्हणाले नोकरी सोडून तुमच्यासोबत काम करणार. बाळासाहेब म्हणाले इकडे काही नाही, काळोख आहे, तरी ते म्हणाले तुमच्यासोबत काम करायचं आहे. आज हजारो लाखो लोकांना त्यांच्यामुळे नोकऱ्या मिळाल्यात ही जिद्द होती, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली. 

लोक येतात जातात त्यांची कर्म त्यांच्यासोबत जातात, आगे बढो म्हणतो पण तुम्ही सोबत असणार आहात का? सध्या वकवक सुरु आहे, सगळं मला पाहिजे. तुम्हाला जायचं असेल तर जरूर जा. पण जे गेले त्यांचा काय सुरु आहे त्यांना विचारा. माणसं विकली जात आहेत. युनियन क्षेत्रात दुकानदारी सुरू आहे, असे म्हणत कामगार क्षेत्रातील सद्यस्थितीवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. सगळ्या उद्योगामध्ये माझे मालक ओळखीचे आहेत, पण माझं नातं गेटवर लागलेल्या भगव्याशी आहे, मालकाशी नाही. भगवा सोडून दुसरं फडक आलं तर त्याचा फक्त वापर डोळे पुसायला होईल. 

अमेरिका इराण युद्ध सुरु आहे, ते लेझीम सारखं चालू आहे. बातमी आलेली दुबईमध्ये उत्तर भारतीय काम करत आहे. देश म्हणतोय परत या.. ते म्हणताय देशात येऊन बेकारीने मरण्यापेक्षा आम्ही बॉम्बने मरू. मेलो तरी चालेल पण काम सोडून माझ्या देशात जाणार नाही, असं ते कामगार म्हणताय तरी नेत्यांकडे त्यांचं लक्ष जात नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.  

नुसतं हायर आणि फायर सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणताय विरोधकांचे बुरखे फाडणार, अरे आम्ही हिंदू आहोत बुरखे काय फाडणार? मुख्यमंत्री तुम्ही लोकसभेत होतात का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. महिला आरक्षण बद्दल एवढा कळवळा असेल तर संसदेचं उद्घाटन करताना आणि अयोध्या राम मंदिरावेळी राष्ट्रपतींना का बोलवलं नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून का? असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महिला आरक्षण लागू करा मी आज सुद्धा म्हणतो लागू करा, हा नवा विषय नाही. रवीश कुमार यांचा एपिसोड पाहा, काही राज्य कुटुंब नियोजन कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबवत आहेत. मग, कुटुंब नियोजन करणे गुन्हा आहे? मोहन भागवतांचं चांगलं आहे, मुलं जन्माला घाला? त्यांना पोसणार कोण? त्यानंतर बेकारीचा काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.